मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा
प्रतिनिधी/ पणजी
ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार किंवा कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर त्या सोडविण्यात सरकार कटीबद्ध आहेत. जर ज्येष्ठ नागरिकांवर जर कुणी अत्याचार करत असतील तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करून त्यांना तुरूंगात घालता येते. मुलांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत थोडासा वेळ घालविणे गरजेचे आहे. घरात आजी आजोबा असले तर लहान मुलांवर चांगले संस्कार घडू शकतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महालक्ष्मी स्कूल कुडणे येथे हेल्पएज इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वॉकथॉनच्या उद्घाटन सोहळय़ात बोलताना केले.
यावेळी दत्तप्रसाद पावसकर, कळंगूटचे आमदार मायकल लोबो, कुडणे महालक्ष्मी हायस्कूलचे व्यवस्थापन, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या वॉकथॉनला सुमारे 200 विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता.
ज्येष्ठ नागरिक कुठल्याही प्रकारच्या अत्याचारांना बळी पडत असतील किंवा घरातील गैरवर्तन करत असतील तर त्या व्यक्तीविरोधात ज्येष्ठ नागरिकांनी त्वरित पोलिस स्थानकात तक्रार दाखल करावी. हेल्पएज इंडिया मागील काही वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच इतर समस्या निवारण करण्याचे कार्य संपूर्ण गोव्यात करत आहे. या संस्थेला त्यांच्या कार्यात राज्य सरकार सदैव सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.