ऑनलाईन टीम / मुंबई :
शनिवारी रात्री राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस स्टेशनबाहेर पडताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. या घटनेचं समर्थन करत शिवसेना पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोमय्यांवर हल्ला झाला तेव्हा त्यावेळची परिस्थिती तशी होती. जो नडला, त्याला फोडला अशी बाळासाहेबांची शिकवण आहे. ते तर शिवसैनिक आहेत. सोमय्याच काय पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी त्या गाडीमध्ये असते, तरी शिवसैनिकांनी ती गाडी फोडली असती, अशा शब्दात सय्यद यांनी भाजपवर हल्ला चढवला. सय्यद यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
रायगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सय्यद म्हणाल्या, मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून जे काही राजकीय नाटय़ सुरु आहे त्याला राणा कुटुंबीय जबाबदार आहेत. राणा कुटुंबीय ही मोदीजींची माकडं आहेत. हे लोक अचानक येतात आणि बोलतात. आम्ही मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा म्हणणार. तुम्हाला हनुमान चालीसा पठण करण्यास मनाई नव्हती. तुम्ही प्रेमानं या मंदिरांमध्ये येऊन हनुमान चालीसा पठण करायची. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही याचंही राजकारण केलं.
दरम्यान, या सर्व नाटय़ानंतर राणा दाम्पत्याला अटक झाली. त्यावेळी त्यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यावेळची परिस्थितीच तशी होती. ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्या गाडीत सोमय्या यांच्याऐवजी पंतप्रधान मोदी असते तरी ती शिवसैनिकांनी फोडली असती, असे सय्यद यांनी म्हटले आहे.