कुरुंदवाड / प्रतिनिधी
हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे देशात स्वागत होत असतानाच येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या पुढाकारातून चर्मकार समाजाने विधवा प्रथा बंदच्या निर्णयाची प्रथम अंमलबजावणी केली आहे. पती मृत झाल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे अशा कुप्रथा बंद करून निर्णायक पाऊल उचलल्यामुळे या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.
हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला पण तो अंमलात आणणे ही एवढी सोपी गोष्ट नव्हती, मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व चर्मकार समाजातील पदाधिकारी यांनी याची अंमलबजावणी केली आहे.
हेरवाड येथील विष्णू गायकवाड वय (६० ) हे मयत झाले होते. मात्र या पदाधिकार्यांच्या पुढाकाराने थेट माने यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदबाबत जनजागृती केली. महिलांनाही सर्वांच्याबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने ही प्रथा बंद करुन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन पदाधिकार्यांनी केले. यावर चर्मकार समाजातील पदाधिकार्यांनी कशाचाही विलंब न करता होकार दर्शविला आणि समाजाने विधवा महिला प्रथा बंद करून क्रांतिकारी स्मशाल पेटवली. या अंमलबजावणी बद्दल या समाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.