आसाममध्ये यात्रेच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ इटानगर
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सातव्या दिवशी अरुणाचल प्रदेशात पोहोचली. याचदरम्यान आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंबंधी व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आसाममधील लखीमपूरमध्ये ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या ताफ्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावेळी पोस्टर आणि बॅनर फाडण्याबरोबरच वाहनांची तोडफोड केली. याचदरम्यान काँग्रेसने भाजपवर जोरदार शाब्दिक शरसंधान केले आहे. आसामचे मुख्यमंत्री मोदी सरकारच्या सूचनांचे पालन करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच हा भारताचा प्रवास आहे, अन्यायाविरु द्ध न्यायाचा प्रवास. कोणतीही शक्ती ‘भारत जोडो न्याय यात्रा’ रोखू शकत नाही. हा प्रवास सुरूच राहील… जोपर्यंत आम्हाला न्यायाचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मार्गक्रमण सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.