राहुल गांधी यांचे गुंडलूपेठमध्ये जंगी स्वागत
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशातील जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण ‘भारत जोडो’ यात्रा सुरु केली आहे. राज्यघटनेचे रक्षण आणि रा. स्व. संघ, भाजपच्या तत्त्वांविरुद्ध पदयात्रा मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. शुक्रवारी भारत जोडो यात्रा केरळमधून कर्नाटकात दाखल झाली. याप्रसंगी चामराजनगर जिल्हय़ाच्या गुंडलूपेठ येथे यात्रेच्या स्वागतपर मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना जनतेच्या वतीने आवाज उठविण्यासाठी पदयात्रेशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नव्हता, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, राज्यघटनेचे रक्षण करण्याचा हेतू असलेली यात्रा रोखणे कोणात्याही शक्तीला शक्य नाही. रा. स्व. संघ, भाजपची विचारधारा देशात द्वेष, हिंसा निर्माण करीत आहे. त्यामुळे देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करण्याची गरज आहे, अन्यथा तिरंगा ध्वजाला महत्त्व नाही. देशाला सामोरे जावे लागत असलेल्या समस्या, देशातील हिंसाचार यासह विविध विषयांवर बोलण्यासाठी विरोधी पक्षासाठी संसदभवन, विधानसौध आणि प्रसारमाध्यमे बंद आहेत. त्यामुळे जनतेशी संपर्क साधण्यासाठी पदयात्रेशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भारत जोडो यात्रा शुक्रवारी सकाळी केरळमधून कर्नाटकात दाखल झाली. यापूर्वी 20 दिवस ही यात्रा केरळमध्ये चालली. राज्यातील चामराजनगर जिल्हय़ाच्या गुंडलूपेठ येथे राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. चामराजनगरमधील व्याघ्रसंरक्षित भागात पदयात्रेला अनुमती नाकारण्यात आल्याने राहुल गांधी व इतर नेते तामिळनाडूच्या गुडलूर येथून वाहनाने गुंडलूपेठ येथे आले. याप्रसंगी कर्नाटकाच्या सीमेवरील केक्केनहळ्ळी येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मंत्री के. जे. जॉर्ज, महदेवप्पा यांच्यासह इतर नेत्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. तेथून सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांच्यासमवेत गुंडलूपेठपर्यंत 25 कि. मी. कारने प्रवास केला. गुंडलूपेठ येथील डॉ. आंबेडकर भवनजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी रासुल गांधी यांचे स्वागत केले. त्यानंतर काही अंतरापर्यंत सर्व नेते पायी चालत मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले. हजारो काँग्रेस कार्यकर्ते यावेळी पदयात्रेत सहभागी झाले होते.
आज देशात नवा इतिहास ः शिवकुमार
आज देशात नवा इतिहास रचला जात आहे. आपले नेते राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 3,570 कि. मी. पदयात्रा काढत आहेत. हे पाऊल देशहितासाठी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली. शुक्रवारी राज्यात दाखल झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. बेरोजगार युवकांच्या समस्यांवर तोडगा काढणे, शेतीमालाला योग्य दर मिळवून देणे, भ्रष्टाचार निर्मूलन, महागाईला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविणे हे महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवून पदयात्रा काढण्यात आली आहे. काँग्रेसने कधीही सत्तेचा विचार केलेला नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाच्या संधी होत्या. मात्र, त्यांनी देशाकरिता अधिकाराचा त्यागा केला. आज सर्वसामान्यांच्या आपल्यासोबत घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत, असेही ते म्हणाले.
कर्नाटक काँग्रेससाठी आजपासून राहुकाल सुरु झाला आहे, अशा शब्दात राज्य भाजपने राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर टिप्पणी केली आहे. दररोजचा आनंद आज्ण शांततेला ‘राहु’ संबंधित कार्यक्रमांपासून अंतर राखा. जनहितार्थ जारी, अशी खोचक टिप्पणीही भाजपने आपल्या ट्विटर हॅन्डलवर केली आहे. दहशतवादाविषयी मृदू धोरण अवलंबून देशविभाजन केलेल्यांची ही भारत जोडो यात्रा नाही. एआयसीसीच्या भावी अध्यक्षांच्या हितरक्षणासाठी सुरू असलेली कसरत आहे, असा टोमणाही भाजपने लगावला आहे.