प्रतिनिधी/ महाबळेश्वर
सातारा जिह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्या शेजारी वनविभागाच्या जागेत झालेले अतिक्रमण पाडण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी नामवंत वकिलांची नियुक्ती करावी, तसेच या प्रकरणी सद्यस्थिती समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ शासकीय अधिकार्यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या वेळी मुख्यंमत्री शिंदे यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक आयोजित करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. याविषयीचे निवदेन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिले आहे.याबाबत बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले कि
अफझलखान व सय्यद बंडाच्या कबरींच्या उदात्तीकरणाविरोधात आमचा गेले 20 वर्ष विधिमंडळ व शासन स्तरावर संघर्ष सुरु आहे.यामधे आम्हाला कांही प्रमाणात यश देखील आले आहे. पण अफझलखान व सय्यद बंडाच्या कबरीशेजारील जागेत झालेले बेकायदा बांधकाम व अतिक्रमण अद्याप हटवले गेलेले नाही.हे अतिक्रमण हटवण्याच्या मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अफझलखानाच्या अनुयायांनी मा.सर्वोच्च न्यायालयात जावुन स्थगिती मिळवली आहे.हि स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारची आणी शिवभक्तांची बाजु मांडण्यासाठी नामवंत वकिलांची नियुक्ती सरकारने करावी यासाठी आज आम्ही मा.मुख्यमंत्री व मा.वनमंत्री यांची भेट घेतली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी वरिष्ठ शासकीय अधिकार्यांची बैठक आयोजित करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत.लवकरच नामवंत वकिलांच्या नियुक्तीचा आदेश होईल अशी मला आशा आहे असेही शिंदे म्हणाले आहेत.यावेळी आदित्य पटवर्धन, गजानन मोरे उपस्थित होते.