उत्पादन वाढल्याची संसदेत दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोळशाची कुठल्याही प्रकारे कमतरता नाही. चालू आर्थिक वर्षाच्या जून 2020 पर्यंतच्या तिमाहीत मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 31 टक्के अधिक कोळशाचे उत्पादन झाल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली आहे. लोकसभेत भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या पूरक प्रश्नाच्या उत्तरादाखल कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
2020-21 मध्ये 71.60 कोटी टन कोळसा उत्पादनाच्या दुलनेत देशात 2021-21 मध्ये 77.81 कोटी टन कोळशाचे उत्पादन झाले होते. चालू आर्थिक वर्षाच्या जूनपर्यंतच्या तिमाहीत देशात मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 31 टक्के वृद्धीसह 2.048 कोटी टन कोळशाचे उत्पादन झाल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.
एप्रिल ते जून 2022 दरम्यान विद्युत मंत्रालयानुसार ऊर्जेची आवश्यकता आणि ऊर्जा पुरवठा यांच्यातील राष्ट्रीय स्तरावरील अंतर केवळ 1 टक्के होते. ऊर्जेची मागणी आणि पुरवठय़ातील अंतर सर्वसाधारणपणे देशातील विजेच्या उपलब्धतेतील अपुरेपणा तसेच वितरण हे नेटवर्क तसेच आर्थिक अडथळे, उत्पादन प्रकल्प बंद पडल्याने उद्भवत असते असे जोशी यांनी सांगितले आहे.
चालू वर्षात देशांतर्गत कोळसा उत्पादन 90 कोटी टन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक खाणींमधील उत्पादन बंद होते. अशा खाणींना खासगी क्षेत्राला देऊन उत्पादन सुरू करण्याचा पुढाकार घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.