ऑनलाईन टीम/तरुण भारत
बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी आज पुण्यातील वडगाव मावळ येथून जनआक्रोश आंदोलनाला सुरूवात केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे सतत दिल्लीचा दौरा करत आहेत. मात्र मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत जात आहेत. ते महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत जात नाहीत, असा हल्लाबोल शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी केला आहे. दरम्यान, फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावात होणार होता. मात्र तो प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले मात्र त्यातील एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. त्यात फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर गेले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठा उपलब्ध होणार होता. परंतु, या सरकारने तरुणांच्या तोंडातील घास हिरावून घेतला, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
‘ज्यांनी कोरोनाच्या काळात देखील राजकारण केलं ते विरोधक आता आम्हाला राजकारण करु नका असं म्हणतात. आम्ही तरुणांच्या प्रश्नांसाठी लढत आहोत. परंतु, रोजगाराबाबत बोलणं, त्याबाबत प्रश्न उपस्थित करणं याला जर विरोधक राजकारण म्हणत असतील तर आम्ही राजकारण करत आहोत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.
“राज्यातले सरकार हे खोके सरकार आहे. मुळात हे सरकार नसून सर्कस आहे. हे बेकायदेशीर सरकार आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळणार आहे. आज सरकारमध्ये काम करताना आमच्या गटात कोण येते आहे, याकडेच त्याचे लक्ष आहे. मात्र, राज्यातला तरुण रोजगार मागतो आहे, त्याकडे त्यांचे लक्ष नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकावर केली आहे.
“आज राजकारणाची पातळी खालावली आहे. गणपतीच्या मिरवणुकीत आमदार बंदूक काढतो, हे योग्य नाही. या ४० गद्दारांनी आमच्यावर कितीही वार केले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. हे ४० गद्दार आज थयथयाट करत आहे. माझे ४० गद्दारांना आव्हान आहे, तुमच्या हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवा, आपल्या आमदाराकीचा राजीनामा द्या, तुमच्याबरोबच मी सुद्धा राजीनामा देतो. हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा”, असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले.