ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. “२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अजमल कसाब याच्यासाठीही एव्हढी सुरक्षा ठेवण्यात आली नव्हती, जेव्हढी या आमदारांसाठी ठेवण्यात आली आहे” असे ते म्हणाले.
आज झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी तसेच सोमवारी होणाऱ्या फ्लोअर टेस्टसाठी बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यांना दक्षिण मुंबईतील विधानभवन परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. विधानसभेकडे निघण्यापुर्वी आमदारांना कडेकोट बंदोबस्तात सुरक्षा पोहोचवली होती. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्हाला कशाची भीती वाटत आहे? तुमच्याकडील काही आमदार पळून जातील म्हणून? पण एवढी भीती कशाला बाळगता?” “आज आलेले बंडखोर आमदार आमच्याकडे डोळसपणे पाहू शकले नाहीत. एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये किती वेळ फिरणार आहात? आज ना उद्या या सर्व आमदारांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात जावचं लागणार आहे.” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी आरे जंगल आणि महाराष्ट्रातील राजकिय बंड या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयाचा पुनर्विचार करावा. असे आवाहन केले.