पंचायत सदस्यांना सांभाळतानाच विकासकामांकडे लक्ष देण्याचे आव्हान, निवडून आलेल्या पंचांमध्ये नवीन चेहऱयांचे मोठे प्रमाण
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील सात पंचायतींपैकी गावडोंगरी पंचायत वगळता बाकीच्या सहाही पंचायतींमधील सरपंच हे नवीन चेहरे असून आपापल्या पंचायतीमधील पंचांना सांभाळून घेतानाच पंचायतीच्या विकासकामांकडे लक्ष देण्यासाठी या सरपंचांना बरीच कसरत करावी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
गावडोंगरी पंचायतीचे यापूर्वी बरीच वर्षे सरपंच राहिलेले धिलोन उर्फ यशवंत देसाई हे 25 वर्षांनी परत एकदा पंचायत राजकारणात उतरलेले असून त्यांची या पंचायतीवर पंच या नात्याने बिनविरोध निवड झाली आहे. या पंचायतीवर निवडून आलेल्यांपैकी अशोक भि. वेळीप, प्रभाकर गावकर हे अनुभवी पंच असले, तरी बाकीचे सर्व पंच नवीन आहेत. खोतीगाव, आगोंद पंचायतीची तीच गत असून या दोन्ही पंचायतेमध्ये बहुतेक नवीन चेहरे निवडून आलेले आहेत.
पैंगीणच्या सरपंचपदी निवड झालेल्या सविता तवडकर, लोलये पोळेच्या प्रतिजा बांदेकर, खोतीगावचे आनंदू देसाई, श्रीस्थळच्या सेजल गावकर, आगोंदच्या फातिमा रॉड्रिग्स या पहिल्यांदाच पंचायतीवर निवडून येऊन सरळ सरपंचपदावर आरूढ झाल्या आहेत. त्यामानाने खोलचे सरपंच अजय पागी ही दुसऱयांदा निवडून आलेली व्यक्ती आहे. या तालुक्यातील लोलये पोळे, पैंगीण, आगोंद आणि खोल या चार पंचायतींमध्ये पर्यटन व्यवसायाला वाव आहे. आगोंद किनारपट्टी जगाच्या नकाशावर नोंद झालेली आहे. या पंचायतीमधील बहुतेक पर्यटन व्यवसाय आज परप्रांतीय व्यक्तींच्या हातात गेलेला आहे. या ठिकाणचे कासव पैदास केंद्र आणि अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची कामगिरी नवीन पंचायत मंडळाला करावी लागणार आहे.
पैंगीण पंचायतीसमोर रखडलेल्या प्रकल्पांचे आव्हान
पर्यटन क्षेत्राबरोबरच मागच्या जवळजवळ 40 वर्षांपासून रखडलेले पैंगीणमधील पोटके मैदान, मुठाळ येथील औद्योगिक वसाहत यासारख्या प्रकल्पांचे आव्हान नवीन सरपंच आणि पंचायत मंडळासमोर आहे. या पंचायतीत सतीश पैंगीणकर, महेश नाईक, सुनील पैंगणकर हे अनुभवी सदस्य आहेत. विपीन प्रभुगावकर यांच्या पत्नी या पंचायतीमधून निवडून आलेल्या आहेत. त्यांचा अनुभव बऱयापैकी कामाला येणार आहे.
लोलये पंचायतीत अजय लोलयेकर, सचिन नाईक, आशुतोष बांदेकर, राजेश नाईक हे अनुभवी पंच असले, तरी सरपंचपद महिलांसाठी राखीव असलेल्या या पंचायतीमधील चारही महिला सदस्या नवीन आहेत. मागच्या काही वर्षांपासून रखडलेला ऍाक्ट्रॉय कराचा प्रश्न, माड्डीतळप येथील कचऱयाचा प्रश्न, काही ठिकाणची पाणीटंचाई यासारखे विषय नवीन सरपंच प्रतिजा बांदेकर यांना हाताळावे लागतील.
खोतीगावचे बहुतेक पंच नवीन
खोतीगावचे बहुतेक सर्व पंच नवीन आहेत. काणकोणचे आमदार तथा माजी मंत्री स्व. वासू पायक गावकर यांचा कारभार जवळून पाहिलेल्या आणि त्यामुळे सरकारी कामकाजाचा अनुभव असलेल्या आनंदू देसाई यांच्याकडे येथे सरपंचपद चालून आलेले आहे. राजेश गावकर, दया गावकर यासारख्या मागच्या कित्येक वर्षांपासून पंचायतीवर राज्य करणाऱया उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. येथील सात पंचांपैकी सहा पंच आदिवासी समाजातील आहेत. त्यांना बरोबर घेऊन सरपंच आनंदू देसाई कशी पंचायत चालवतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
मागच्या कित्येक वर्षांपासून आपल्या कुटुंबाकडे वॉर्ड राखून ठेवलेल्या आणि पंचायतीवर निवडून येणाऱया देवेंद्र नाईक यांचा धक्कादायक असा पराभव या निवडणुकीत झालेला आहे. दुसऱया वॉर्डातून आलेल्या धिलोन उर्फ रामू नाईक यांनी त्यांना पराभूत केले आणि त्यांची या वॉर्डातील मक्तेदारी संपविली. रामू नाईक आणि त्यांच्या वहिनी लेविया संजू नाईक या एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती श्रीस्थळ पंचायतीमध्ये पोहोचल्या आहेत. त्याशिवाय गणेश गावकर हे अनुभवी पंच या पंचयातीमध्ये आहेत. तरी देखील सरपंच सेजल गावकर आणि उपसरपंच शिवराज ना. देशमुख या नवीन व्यक्तींकडे ही पंचायत सोपविण्यात आली आहे. विपन्नावस्थेतील श्रीस्थळ औद्योगिक वसाहत, जवळजवळ 20 वर्षांपासून अपूर्ण असलेला श्रीस्थळचा क्रीडा प्रकल्प यांची जबाबदारी नव्या पंचायत मंडळावर येऊन पडली आहे.
खोलमधील समीकरणांत बदल
बऱयाच कालावधीनंतर खोल पंचायतीवरील श्रीनिवास नायक व पूर्णा नायक यांची पकड यंदा ढिली झाली आहे. त्याचवेळी गोवा मुक्तीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून पहिल्यांदा वडील वासू प्रभुदेसाई, त्यानंतर अर्चना प्रभुदेसाई आणि स्वतः मिळून सतत वॉर्डावर पकड ठेवून असलेले पंढरी उर्फ बाबू प्रभुदेसाई यावेळी परत एकदा पंचायतीवर पोहोचले आहेत. यावेळी देखील सरपंचपदावर त्यांचा दावा होता. परंतु पत्नीही पंचायत मंडळावर असल्याचा लाभ अजय पागी यांना झाला. नपेक्षा यावेळी पंढरी प्रभुदेसाई हे सरपंच झाल्याचे पाहायला मिळाले असते.
बहुसंख्य आदिवासी समाज असलेल्या या पंचायतीमधील बहुतेक सर्व वॉर्ड यापूर्वी कधी इतर मागासवर्गीय, तर कधी अनुसूचित जमातींसाठी राखीव राहिलेले आहेत. मात्र पंढरी प्रभुदेसाई यांचा वॉर्ड फार तर महिलांसाठी राखीव झाला, तो देखील सर्वसाधारण गटातील महिलांसाठी. याचे कोडे मात्र कुणी सोडवू शकलेले नाही. या पंचायतीमध्ये असलेला काब-द-राम किल्ला, पर्यटन क्षेत्रामुळे किनारपट्टीवर झालेले अतिक्रमण, जमीन बळकाव प्रकरणे यासारख्या अनेक समस्या येथे असून त्या नवीन पंचायत मंडळ कसे सोडवते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
तालुक्यातील बहुतेक सर्व पंचायती भाजपप्रणित गटाकडे आहेत. सभापती असलेले रमेश तवडकर आणि माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा वरदहस्त या पंचायतींवर असल्यामुळे सरकारी योजना, अधिक निधी त्यांच्याकडे पोहोचायला वेशेष विलंब लागणार नाही. मात्र पंचायत कारभाराचा ज्यांना विशेष अनुभव नाही अशा वरील सर्व व्यक्तींसमोर हे फार मोठे आव्हान असून अनुभवी व्यक्ती आणि सरकारचा लाभ कशा प्रकारे या पंचायती घेतात त्यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.