सरकारतर्फे अधिसूचना जारी : पंचायत मंडळांची सत्ता संपुष्टात,अकरा पंचायतींवर जुलैमध्ये प्रशासक
प्रतिनिधी /पणजी
सरकारने 175 पंचायतींवर प्रशासक नेमले असून तेथील पंचायत मंडळे आता विसर्जित झाली आहेत. सरपंच, उपसरपंच यांची सत्ता संपुष्टात आली असून 19 जूनपासून प्रशासक पंचायतींचा ताबा घेणार आहेत. आठवडय़ातून दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी प्रशासकांनी पंचायत कार्यालयात हजेरी लावून कामकाज हाताळावे, असा आदेशही जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारतर्फे प्रशासक नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पंचायतींचा कार्यकाळ 18 जून रोजी संपत असल्यामुळे आणि आता निवडणूक घेणे शक्य नसल्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला आहे. ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या प्रभाग आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून तोपर्यंत पंचायतीचे कामकाज हाताळावे म्हणून प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.
अकरा पंचायतींवर जुलैमध्ये प्रशासक
पंचायतींची निवडणूक व सरपंच, उपसरपंच यांची नेमणूक होईपर्यंत प्रशासक पंचायतींचा कारभार पाहणार असून बीडीओशी (गटविकास अधिकारी) सल्लामसलत करुन महत्त्वाचे निर्णय घेण्यात यावेत अशी सूचना प्रशासकांसाठी देण्यात आली आहे. एकूण 11 पंचायतींचा कार्यकाळ 9 जुलै 2022 रोजी संपणार असल्याने तेथे सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. ती मुदत संपण्यापूर्वी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्या 11 पंचायतीवर प्रशासक नेमल्यानंतर एकूण 186 पंचायती प्रशासकाच्या अखत्यारीत येणार आहे. गोव्यात एकूण 191 पंचायती असून 5 पंचायतींचा कार्यकाळ नंतर संपुष्टात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारी अधिकाऱयांची प्रशासक म्हणून नियुक्ती
सरकारने प्रशासक म्हणून सरकारी अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. सरपंच – उपसरपंच यांना किंवा सचिवांना प्रशासक म्हणून नेमण्यात येणार असल्याची अपेक्षा काही जणांना होती परंतु ती सरकारने फोल ठरवली असून सरकारी अधिकारी यांना प्रशासक नेमून सरपंच, उपसरपंच व एकंदरित पंचायत मंडळाची सत्ताच संपुष्टात आणली आहे. यापूर्वी पंच असलेला सदस्य आता पंच राहिलेला नाही. आता निवडणूक झाल्यानंतरच नवीन पंच, सरपंच, उपसरपंच होणार आहेत. राज्यातील 175 पंचायतींची मंडळे विसर्जित झाली असून इतर पंचायत मंडळे मात्र अस्तित्वात आहेत.