निवडणुकीसाठी आता 20 डिसेंबरपर्यंत मुदत : निश्चित करावी लागणार ओबीसी राखीवता,येत्या स्वातंत्र्यदिन, गांधी जयंतीदिनी ग्रामसभा
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील सुमारे 175 पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून तेथे आज सोमवार दि. 20 जूनपासून प्रशासक ताबा घेणार आहेत. सरपंच, उपसरपंच, इतर पंच तसेच एकूण पंचायत मंडळांची सत्ताही संपली असून आता नेमण्यात आलेल्या प्रशासकांची सत्ता सुरु झाली आहे. निवडणूक होऊन पंचायत मंडळे स्थापन होईपर्यंत तसेच सरपंच, उपसरपंच निवडीपर्यंत प्रशासकांची सत्ता कायम राहाणार आहे.
पंचायत क्षेत्रातील प्रमुख कामे आता प्रशासक करणार असून ते तालुका गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
स्वातंत्र्यदिन, गांधी जयंतीदिनी ग्रामसभा
दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती असे दोन दिवस यापूर्वीच ग्रामसभेसाठी निश्चित करण्यात आले असून त्या दिवशी प्रशासक ग्रामसभा घेऊ शकतात आणि त्यात ग्रामस्थांच्या मागणीनुसार निर्णय होऊ शकतात, अशी माहिती पंचायत खात्यातील सूत्रांनी दिली.
निवडणुकीसाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदत
पंचायत सचिवांशी चर्चा करुन सरपंच, उपसरपंच यांची कामे प्रशासकांना करावी लागणार असून सचिवांना त्यांना मदत करण्याची सूचना देण्यात आली आहे. आता 6 महिने म्हणजे दिवाळीपर्यंत तरी 175 पंचायतींवर प्रशासकांची सत्ता राहाणार आहे. आता 6 महिन्यांपर्यंत म्हणजे 20 डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाला मिळणार आहे.
निश्चित करावी लागणार ओबीसी राखीवता
या सहा महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी राखीवता निश्चित करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तशी अटच घातली असल्याने त्या अटीचे पालन केल्याशिवाय आता सरकारला पर्याय राहिलेला नाही.
अन्य 11 पंचायतींची मुदत 7 जुलै रोजी संपुष्टात येणार असून त्यांच्यावर प्रशासक नेमण्याची अधिसूचना मुदत संपण्यापूर्वी काढावी लागणार आहे.
निवडणूक पुढे गेल्याने ‘कहीं खुशी… कहीं गम’
ग्राम पंचायतीसाठी निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार असून अनेकजण निवडणूक पुढे गेली म्हणून मनोमन सुखावले आहेत तर सरपंच-उपसरपंच असणारे आपली पदे गेली म्हणून दुखावले आहेत. अनेक सरपंचांना प्रशासक म्हणून नेमले जाईल अशी आशा होती परंतु त्यांची निराशा झाली असून काही कामे करायची असतील तर त्यांना आता प्रशासकाकडे मनधरणी करावी लागणार आहे. थोडक्यात म्हणजे आज सोमवार दि. 20 जूनपासून 175 पंचायतीवर प्रशासकराज सुरू होत आहे.