ऑनलाईन टीम / सातारा :
राजघराण्यातील सदस्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते (ADV GUNRATNA SADAVARTE) यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने (SATARA DISTRICT COURT) 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन (BAIL GRANTED) मंजूर केला आहे. मात्र, सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस गिरगाव न्यायालयात हजर झाले आहेत. तर अकोला पोलिसांचे पथकही यासाठीच मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे साताऱ्यात जामीन मिळाला असला तरीही सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर अथवा अकोला पोलिसांकडे जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाला विरोध, शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील हल्ला अशा कारणांनी कायम वादग्रस्त भूमिकेत राहिलेले सदावर्ते यांनी सातारा-कोल्हापूर राजघराण्याबद्दल बोलताना या अफजल्याच्या औलादी आणि असल्या घराण्याला मी मानत नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी 9 ऑक्टोबर 2020 ला सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.14 एप्रिलला सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. तेव्हा सदावर्ते यांन 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यावर युक्तीवाद झाला. मात्र, जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाने त्यांना 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दरम्यान, मुंबई, सातारा व्यतिरिक्त सदावर्ते यांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल आहे. कोल्हापुरात मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कोल्हापूर पोलीस सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी गिरगाव न्यायालयात हजर झाले आहेत. अकोला पोलिसांनाही सदावर्ते यांचा ताबा हवा असून, त्यांचेही एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे सदावर्तेंचा ताबा कोणाकडे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.