वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचा शेजारी असणाऱ्या बांगलादेशमध्ये सध्या अत्यंत तणावपूर्ण स्थिती आहे. त्यामुळे भारतीयांनी त्या देशाचा प्रवास टाळावा, अशी सूचना बांगलादेशातील भारताच्या उच्चायोग कार्यालयाने प्रसारित केली आहे. सध्या जे भारतीय नागरिक बांगलादेशात आहेत, त्यांनी अत्यंत तातडीच्या कारणांशिवाय आपल्या राहण्याच्या स्थानापासून बाहेर जाऊ नये, अशीही सूचना देण्यात आली आहे. बांगलादेशमधील सत्ताधारी अवामी लीग या पक्षाची विद्यार्थी संघटना आणि रस्त्यांवर उतरलेले हजारो निदर्शक यांच्यात अनेक ठिकाणी चकमकी उडाल्याची माहिती देण्यात आली आहे. बांगला देशात सध्या आरक्षणाच्या विरोधात हिंसक आंदोलने होत आहेत. राजधानी ढाका, चितगांव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथे मोठा तणाव या हिंसाचारामुळे निर्माण झाला असून संचारबंदी लागू आहे.