वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी शनिवारी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने जोरदार प्रचार केला आहे. मतदारांनी मोदींना भरभरून यश द्यावे अन्यथा शहरा शहरांमधून अनेक अफताब पुनावाला जन्माला येतील, असा इशारा त्यांनी दिला. भाजपचा विजय झाला तरच राष्ट्रविघातक प्रवृत्ती नियंत्रणात राहतील, असेही प्रतिपादन सर्मा यांनी केले.
भारतीय जनता पक्ष मुस्लीम महिलांचा सन्मान करतो. त्यांना हिंदू महिलांप्रमाणे समान अधिकार मिळाले पाहिजेत, अशी भाजपची धारणा आहे. तोंडी तत्काळ तीन तलाकच्या प्रथेपासून भाजपनेच मुस्लीम स्त्रियांना वाचविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत शांत चित्ताने देशाच्या विकासाची कामे करीत आहेत. आता समान नागरी कायदाही भारतात येणे अशक्य नाही. समान नागरी कायदा आल्यास सर्व धर्मांच्या महिलांना समान अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे मुस्लीम महिलांनाही मोठा दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
समान नागरी कायदा भारतासाठी अत्यंत आवश्यक असून आतापर्यंतच्या सरकारांनी तो लागू करणे हेतूपुरस्सर टाळले होते. या कायद्यामुळे मुस्लिमांची व्होट बँक नाराज होईल, अशी भीती धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱया राजकीय पक्षांवर असते. त्यामुळे ते हिंदूंच्या भावना डावलून समान नागरी कायद्याला विरोध करतात. पण पंतप्रधान मोदी व्यापक समाज हिताचा विचार करीत असल्याने त्यांनी अनेक धाडसी पावले समाज सुधारण्यासाठी उचलली आहेत, अशी प्रशंसा त्यांनी केली.