गुजरातमध्ये अमित शाह यांचे उद्गार
गुजरातमध्ये पूर्वी समाजकंटक हिंसक कृत्यांमध्ये सामील असायचे आणि काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असायचा. परंतु 2002 मध्ये ‘धडा शिकविल्या’वर गुन्हेगारांनी हिंसक कृत्ये सोडून दिली आणि भाजपने राज्यात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित केल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी काढले आहेत.
फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर एका रेल्वेचा डबा पेटवून देण्यात आल्यावर राज्यातील अनेक भागांमध्ये दंगल उसळली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या शासनकाळात (1995 पूर्वी) वारंवार सांप्रदायिक दंगली व्हायच्या असा दावा शाह यांनी खेडा जिल्हय़ातील महुआ येथे भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ घेतलेल्या प्रचारसभेत केला आहे.
विविध समुदाय अन् जातींच्या सदस्यांना काँग्रेसकडून परस्परांच्या विरोधात चिथावले जात होते. काँग्रेसने अशा दंगलींद्वारेच स्वतःची मतपेढी मजबूत केली आणि समाजातील एका मोठय़ा घटकासोबत अन्याय केला. गुन्हेगारांना दीर्घकाळापर्यंत काँग्रेसकडून समर्थन मिळाल्याने त्यांना हिंसेत सामील होण्याची सवय झाली होती आणि यातून गुजरातमध्ये 2002 साली दंगल झाल्याचा दावा शाह यांनी केला आहे.
2002 मध्ये धडा शिकविण्यात आल्यावर या समाजकंटकांनी हिंसेचा मार्ग सोडून दिला. 2002-22 पर्यंत हे समाजकंटक हिंसेपासून दूर राहिले. सांप्रदायिक हिंसेत सामील लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करत भाजपने गुजरातमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित केल्याचे शाह यांनी महटले आहे.