ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर आझाद यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात होते. ते भाजपात प्रवेश करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आझाद यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आपण स्वत:चा पक्ष काढणार असल्याचे आझाद यांनी आता जाहीर केले आहे.
याबाबत बोलताना आझाद म्हणाले, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. माझे विरोधक मी तीन वर्षांपासून भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावडय़ा उठवत होते. त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते. आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा भाजप प्रवेशासंदर्भातील चर्चांना उधाण आले. पण मी भाजपात प्रवेश करणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये मी माझा स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याबाबत चाचपणी केली जाईल.
अधिक वाचा : दारूचे गोदाम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 49 लाखांचा ऐवज जप्त
आज सकाळी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहेत. जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. सोनिया गांधी या नाममात्र होत्या. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते, असेही ते म्हणाले.