संतप्त जमावाने पेटवली वाहने, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. नव्याने झालेल्या गोळीबाराच्या घटनेत चौघांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतत्प जमावाने अनेक वाहने पेटवली. दुपारनंतर गोळीबार आणि जाळपोळीचे सत्र सुरू झाल्यामुळे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
गोळीबार करून हल्ला करणाऱ्या बंदूकधाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी हा जातीय तणाव असल्याचे समजते. गोळीबारात चौघांचा मृत्यू होण्याबरोबरच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. लिलॉन्ग चिंगजाओ भागात उभारण्यात आलेल्या छावण्यांच्या परिसरातच गोळीबार करून स्थानिक लोकांना लक्ष्य करण्यात आले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकंदर चौघांचा मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.
हल्ल्यानंतर संतप्त जमावाने तीन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. सदर गाड्या कोणाच्या आहेत हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. ताज्या हिंसाचारानंतर थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आवाहन
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एका व्हिडिओ संदेशात हिंसाचाराचा निषेध करत लिलाँगमधील रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले. गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोरांन लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी जातीय हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून 180 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच शेकडो जखमी झाले आहेत.