चेन्नाई / वृत्तसंस्था
तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिह्यात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेला रविवारी हिंसक वळण लागले. बारावीत शिकणाऱया एका विद्यार्थिनीने गेल्या आठवडय़ात शाळेतील वसतिगृहात आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या पालक आणि नातेवाईकांनी रविवारी शाळा-वसतिगृह प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले. आंदोलक शाळेत धडक देत तेथे उभ्या असलेल्या बसेस पेटवून दिल्या. तसेच शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. या हिंसक घटनेनंतर सध्या जिह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
कल्लाकुरिची येथील चिन्ना सालेम येथील एका खासगी शाळेतील बारावीची विद्यार्थिनी श्रीमथीने 12 जुलैच्या रात्री वसतिगृहाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. 13 जुलै रोजी सकाळी सुरक्षा रक्षकाने मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना याची माहिती दिली. मुलीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले होते. या सर्व प्रकरणावर विद्यार्थिनीच्या मृत्यूला न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती.
सुसाईड नोटमध्ये शिक्षकांवर आरोप
पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मुलीने शाळेतील दोन शिक्षकांवर तिचा आणि काही विद्यार्थ्यांवर सतत अभ्यासासाठी बळजबरीने छळ केल्याचा आरोप केला आहे. या शिक्षकांनी मुलीला शिवीगाळ केल्याचेही लिहिले असून इतर शिक्षकांनाही या घटनेची माहिती होती, असेही नमूद केले आहे. सदर शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलक नातेवाईकांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन
कल्लाकुरिची हिंसाचारावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूची पोलीस चौकशी संपल्यावर आरोपींना शिक्षा होईल. मी डीजीपी, गृह सचिवांना कल्लाकुरिचीला भेट देण्यास सांगितले आहे. मी लोकांना शांतता राखण्याची विनंती करतो, असे ते म्हणाले.
डीजीपींचे स्पष्टीकरण
रविवारी प्रथम काही लोकांनी शाळेत येऊन निषेध व्यक्त केला. त्यानंतर काही वेळातच अचानक बरेच लोक जमा झाले. शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्याऐवजी त्यांनी हल्ला केल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. शाळेवर हल्ला करणाऱया सर्व आरोपींना आम्ही अटक करू. आमच्याकडे व्हिडीओ देखील आहेत, असे तामिळनाडूचे डीजीपी सी सिलेंद्र बाबू यांनी सांगितले.