नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशिया युक्रेनमध्ये जे करीत आहे, तेच चीन भारतात करीत आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांना दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर मते व्यक्त केली. त्यांनी चीनचाही यासंदर्भात उल्लेख केला.
युक्रेनने पाश्चिमात्य जगाशी जवळचे संबंध स्थपित केलेले आम्हाला चालणार नाहीत, असे रशियाने दाखवून दिले आहे. चीनची भारतासंबंधीची भूमिकाही तीच आहे. चीनने यासाठी भारतावर दबाव आणावायस प्रारंभ केला आहे. सीमेपलिकडून चीन भारताच्या भागात घुसखोरी करीत आहे. चीनचे सैनिक आपल्या भूमीत बस्तान मांडून आहेत, असे सेनेचे अधिकारी म्हणतात. पण पंतप्रधान मोदी मात्र असे काहीही घडलेच नाही असे स्पष्ट करतात, असा आरोप गांधी यांनी केला.
आम्ही काहीही केले आणि केव्हाही केले तरी भारत त्याला प्रतिकार करु शकत नाही, हे चीनला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी त्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या भागात घुसखोरी चालविली आहे. तथापि, भारत सरकार या घटना मान्य करण्यात तयार नाही. परिणामी, चीनचा जोर वाढत आहे. चीन सीमेपलिकडे मोठी तयारी करत असून भारताचा प्रतिसाद म्हणावा तसा प्रबळ नाही. धोका वाढला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.