उद्या बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
सुपीक जमिनीतून बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग होत आहे. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. पर्यायी मार्ग सूचविण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत पुन्हा या रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. शुक्रवार दि. 9 रोजी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहण्याची सूचना या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे मार्गामध्ये देसूर, नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, गजपती, राजहंसगड, नागेनहट्टी, नेगीनहाळ, के. के. कोप्प या गावातील तिबारपिकी शेतजमीन जात आहे. या जमिनीमध्ये ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन ही पिके घेतली जातात. विशेष करून नंदिहळ्ळी गावातील जमीन अत्यंत सुपीक आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वारंवार विरोध करूनही पुन्हा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांतून तसेच जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत.
यापूर्वी दोनवेळा नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्याला रितसर उत्तर देण्यात आले आहे. हुबळी येथे जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. तरीदेखील आता पुन्हा नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही खरोखरच गंभीर बाब असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप होत आहे.
आमचा विकासाला विरोध नाही मात्र सुपीक जमिनीतून रस्ता करण्याऐवजी माळ जमिनीतून करावा, अशी मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना विविध कारणासाठी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. यामुळे बेळगाव परिसरातील शेतकरी अक्षरश: वैतागला आहे. हालगा-मच्छे बायपास, रिंगरोड, त्यानंतर आता रेल्वेमार्ग यामुळे शेतकऱ्यांनी करायचेतरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.