अधिकारी गायब असल्याने तीव्र संताप : कार्यालयासमोर शेतकऱ्यांची निदर्शने
बेळगाव : रिंगरोडविरोधात म्हणणे मांडण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठराविक दिवशी हजर व्हावे, असे सांगण्यात आले. मात्र त्याठिकाणी प्रांताधिकारीच वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. बुधवारीही प्रांताधिकारी वेळेत आले नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि तालुका म. ए. समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवून आपले म्हणणे न मांडताच त्यांनी माघार घेतली आहे. रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावांतील जमिनी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी त्याविरोधात यापूर्वीच आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. तरीदेखील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसनुसार शेतकरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात वेळेत हजर होत आहेत. बुधवारी वाघवडे येथील 24, बाची येथील 20 शेतकरी उपस्थित होते. याचबरोबर वकिलांची टीमदेखील हजर होती.
सकाळी 10.30 वाजता हजर रहावे, असे नोटिसीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र म्हणणे ऐकून घेणारे प्रांताधिकारी बलराम चव्हाण हे फिरकलेच नाहीत. त्यानंतर तालुका म. ए. समितीच्या माध्यमातून त्याठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून दुपारी 12.15 वाजता प्रांताधिकारी हजर झाले. मात्र शेतकऱ्यांनी आता आम्ही म्हणणे मांडणार नाही, असे स्पष्ट सांगितले. शेतकऱ्यांच्या तिबारपिकी जमिनी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीदेखील नोटिसा पाठवून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. मागीलवेळीही शेतकऱ्यांना बोलविण्यात आले. मात्र अधिकारी अनुपस्थित होते. आता यावेळीही अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गुरुवार दि. 2 रोजी नावगे आणि बिजगर्णी येथील शेतकऱ्यांना हजर राहण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी प्रांताधिकाऱ्यांना ‘उद्या तरी तुम्ही वेळेत हजर होणार का’? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी उद्या निश्चित हजर राहू, असे सांगितले. आपले म्हणणे मांडण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. शाम पाटील, अॅड. प्रसाद सडेकर, आर. आय. पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, भागोजी पाटील, कृष्णा हुंदरे, दत्ता उघाडे, आप्पा जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.