अध्याय एकविसावा
भगवंत ईश्वराबद्दल उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणाले, ‘प्रभु’ म्हणजे ऐश्वर्ययुक्त स्वामी होय. त्याची शक्ती अचिंत्य, अनंत आहे. तोच छंदोमय वेदमूर्ती होय. तो वस्तुतः अविनाशी असून नित्य सुखमय व सुखमूर्तीच आहे. तो प्राणोपाधी घेऊन नादरूपाने मनःशक्तीला जागृत करतो. तीच स्पर्श-स्वर-वर्ण यांना निर्माण करते. हिलाच वेदवेत्ते पुरुष ‘बृहती’ असे म्हणतात. कारण हिचा विस्तार अपरिमित आहे. ते स्वरांनी व वर्णांनीयुक्त असलेले मंत्र, हृदयाकाशामध्ये विलक्षण रीतीने हजारो शाखांनी विस्तार पावतात. याप्रमाणे वैखरी वाणीचा विस्तार अपरंपार वाढला आहे. स्वर आणि वर्ण इत्यादि असलेली वैखरी वाणी कशी उत्पन्न झाली, ते सांगतो.
अ-उ-म या तीन मात्रा एकत्र झाल्या म्हणजे लोक त्याला ‘ओंकार’ म्हणतात. हा ओंकार अलौकिक असून अत्यंत सूक्ष्म रूपाने देहातच असतो. त्याच ओंकाराला प्राणाच्या संगतीने मूलाधारादी चक्रामध्ये ऊर्ध्वगती सुरू झाली की, परा, पश्यंती, मध्यमा वाणींची अभिव्यक्ति होते. परा वाणीच्या आंत ‘पश्यंती’ श्रे÷त्वाने जन्मास येते. तिच्या पोटी ‘मध्यमा’ जन्मास येते. अशा त्या एकमेकींपासूनच उत्पन्न
होतात.
त्याचप्रमाणे त्या एकमेकींना सोडून कधी एक क्षणभरही राहात नाहीत. त्या एकमेकींना घेऊन एक चक्र ओलांडले म्हणजे दुसरे चक्र व दुसरे ओलांडले म्हणजे तिसरे चक्र, अशा रीतीने वरवरच चढत जातात. ‘मूलाधार’ चक्रामध्ये परा वाचा उत्पन्न होते. ‘स्वाधि÷ान’ चक्रामध्ये पश्यंतीचा जन्म होतो आणि ‘मणिपूर’ चक्रापासून ‘विशुद्धी’ चक्रापर्यंत मध्यमेची जा-ये चालत असते.
तेथून मुखाच्या द्वारे ‘वैखरी’ वाणी प्रगट होते. तेव्हा ती स्वरवर्ण यांच्या उच्चाराने अनेक मंत्ररूपाने गर्जत असते. अशाप्रकारे स्वर व वर्ण यांच्या यथाशास्त्र उच्चाराने व वेदशास्त्रांच्या अर्थप्रकारांनी लौकिक आणि वैदिक भाषा विस्तारलेली आहे. शब्दांच्या नाना प्रकारच्या उपपत्ती लावून, युक्तिप्रयुक्तीने शब्दानेच शब्दाचे खंडन करितात. म्हणूनच वैखरी वाणी अनंत आणि अपार आहे. स्वतः हिरण्यगर्भाच्या रूपाने जीव, शिव आणि अंतर्यामी यांना माझी वेदाज्ञा प्रगट करते. मी अशा रीतीने वेदाचा विस्तार करतो. त्याची ठरलेली मर्यादा संपल्यावेळी त्याचा संहारही मीच करतो. वेदवाणी कर्मकांडामध्ये कशाचे विधान सांगते, उपासनाकांडामध्ये कोणकोणत्या देवतांचे वर्णन करते आणि ज्ञानकांडामध्ये कशाकशाचा अनुवाद करून कोणाकोणाचा निषेध करते, याचे रहस्य माझ्याखेरीज अन्य कोणीही जाणत नाही. ह्या वेदार्थाला खऱया रीतीने जाणणारा मीच एक सर्वज्ञ ज्ञाता आहे. माझ्या कृपेशिवाय हा अर्थ महादेवादिकांच्यासुद्धा हाताला लागायचा नाही. हे ऐकून उद्धवाच्या मनात आले की, वेदातील खरे खरे अर्थस्वारस्य एका देवानाच माहीत आहे आणि श्रीकृष्ण हे भक्ताविषयी कृपाळू आहेत, तेव्हा ते माझ्यावरही दया करून तो अर्थ मला सांगोत. उद्धवाच्या मनातील हेतु जाणून देवाधिदेव तो सांगावयाला पुढे सरले आणि वेदार्थातील सारांश श्लोकरूपाने सांगू लागले.
वेद कर्मकांडामध्ये यज्ञरूपाने माझेच विधान करतात, उपासनाकांडात मलाच देवता म्हणतात ज्ञानकांडात माझ्याखेरीज अन्य वस्तूंचे वर्णन करून “ नेती नेती’’ या वाक्मयांच्याद्वारे अन्य सर्व वस्तूंचा निषेधही करतात. सर्व वेदांचा अर्थ एवढाच आहे. अशा प्रकारे वेद माझ्यामध्येच भेद निर्माण करून ही सगळी माया आहे, असे म्हणून शेवटी भेदाचा निषेध करून वेद प्रसन्न होतात. माझ्या स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी, मलिनचित्त लोकांची चित्तशुद्धी होण्याकरिता वेदाने स्वधर्माचे प्रतिपादन केले आहे आणि विषयांचा त्याग करविला आहे. त्यात अग्निहोत्रादि विधान व यज्ञातील कर्माचरण हे चित्तशुद्धीला मोठे कारणीभूत आहे. त्याच्या योगाने कडकडीत वैराग्य उत्पन्न होते. कडकडीत वैराग्य उत्पन्न झाले व इहपर विषयांची निवृत्ती झाली, म्हणजे साधकाला सहजस्थितीने माझी प्राप्ती होते.
क्रमशः