ऑनलाईन टीम/तरुण भारत
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून सोमवारी होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणीसाठी पुढची संभाव्य तारीख १२ ऑगस्ट ही देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाची सुनावणी लांबली आहे. ८ ऑगस्टला ही सुनावणी पार पडणार होती. पण आता ठाकरे- शिंदे गटाला १२ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्याच्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे आणि त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच १२ ऑगस्ट हा शुक्रवार त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या काही सलग सुट्ट्या त्यामुळे सुनावणीत आणखी काही काळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा मेन्शनिंग करावे लागेल पण ती विनंती मान्य होईल का याची उत्सुकता लागली आहे.
आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली होती. यावर कोर्टानं महत्वाचा निर्णय दिला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आयोगाला दिले आहेत. पण निवडणूक आयोगापुढे आठ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत. सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील अशी शक्यताही नाकारता येत नाही.