उत्साह वाढलेल्या सरकारने ठेवले नवे लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या 95 शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या स्थितीत उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. यामुळे उत्साह वाढलेल्या केंद्र सरकारने वायू प्रदूषण कमी करण्याच्या लक्ष्यात बदल केला आहे. आता 2025-26 पर्यंत वायू प्रदूषणाची पातळी 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 2024 पर्यंत वायूप्रदूषण 20 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य होते. 2017 च्या तुलनेत 2021-22 मध्ये संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषणात घट दिसून आली ओ.
वायू प्रदूषणाची पातळी 40 टक्क्यांनी कमी करून देखील दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनौ आणि कानपूर यासारख्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता स्वीकारार्ह मर्यादेत आणता येणार नाही. नव्या लक्ष्यामुळे संबंधित राज्य राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वतःच्या शहरांमधील स्थिती सुधारण्यासाठी प्रभावी योजना तयार करण्यास प्रेरित होऊ शकतील. गुजरातमध्ये देशाच्या विविध राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत नव्या लक्ष्याची माहिती देण्यात आली आहे.
वाराणसी अव्वल
अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीत 40 टक्क्यांपेक्षा अधिक घट करता येऊ शकते. वाराणसी याचे उदाहरण आहे. 2021-22 मध्ये तेथील पीएम-10 च्या पातळीत 53 टक्क्यांपर्यंत घट नोंदविली गेली आहे. नव्या उद्दिष्टाचा उद्देश पर्टिक्युलेट मॅटर (हवेत मिसळले जाणारे प्रदूषक कण)चे प्रमाण स्वीकारार्ह मर्यादेत आणणे आहे. भविष्यात यासंबंधीचे लक्ष्य पुन्हा दुरुस्त केले जाऊ शकते असे पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
20 शहरांमध्ये सुधारणा
राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाच्या अंतर्गत अलिकडेच करण्यात आलेल्या शहरांच्या विश्लेषणातून 20 शहरांमध्ये (चेन्नई, मदुराई, नाशिक आणि चित्तुर सामील) वायू गुणवत्ता राष्ट्रीय मापदंडानुरुप (पीएम 10, स्वीकारार्ह वार्षिक सरासरी 60मायक्रोग्रॅम्स प्रति क्यूबिक मीटर) आढळली आहे. परंतु यात घातक पीएम-2.5 च्या स्तराबद्दल कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. वायू गुणवत्ता राष्ट्रीय व्यापक मापदंडानुसार पीएम 2.5 ची पातळी वार्षिक सरासरी 40 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर असावी.
मानांकन देण्याची योजना
एनसीएपी अंतर्गत 131 शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व शहरे स्वतःच्या पातळीवर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलत आहेत. राष्ट्रीय परिषदेत या सर्व 131 शहरांना वायू गुणवत्तेतील सुधारासाठी उचलण्यात आलेली पावले आणि यशाच्या आधारावर वार्षिक स्तरावर मानांकन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात या शहरांना सांडपाणी व्यवस्थापन, धुळीचे व्यवस्थापन, बांधकाम अन् तोडफोडीतून निघणाऱया कचऱयाचे व्यवस्थापन, वाहनांमधून निघणारा धुर आणि औद्योगिक प्रदूषण नियंत्रणाच्या आधारावर मानांकन देण्यात येईल.