31 ऑगस्टपासून विमानभाडे मर्यादा हटविण्याचा निर्णय ः विमान कंपन्यांना अधिकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने हवाई प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. 2020 मध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या काळात देशांतर्गत विमान कंपन्यांवर लादलेली विमानभाडे मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तिकिटांच्या किमतींवरील निर्बंध हटवण्यासंबंधीची घोषणा नागरी उड्डयन मंत्रालयाने बुधवारी केली. येत्या 31 ऑगस्टपासून विमान भाडय़ाची मर्यादा हटवली जाणार असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले. या निर्णयामुळे आता दररोजची मागणी आणि एटीएफच्या किमतीच्या विश्लेषणानंतर विमान भाडे मर्यादा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर कॅप काढून टाकल्याने, एअरलाईन कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार असून कंपन्याच विमान भाडे निश्चित करू शकतील. दुसरीकडे, नवीन विमान कंपनी अकासा एअरलाईन्सने स्वस्तात तिकिटे विकून इंडिगो, गो फर्स्टसह विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढवली आहे. अशा स्थितीत विमान कंपनीलाही आपापल्या परीने दर ठरवता येणार आहेत.
कोरोनाच्या काळात एअरकॅप लागू
कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने एअरलाईन्ससाठी ‘एअरकॅप’ ही भाडे कॅप प्रणाली लागू केली, ज्यामध्ये सरकार दर 15 दिवसांच्या अंतराने एअरलाईन्सच्या किमान आणि कमाल तिकीटदर निश्चित करत होते. एअरलाईन्स त्यांचे भाडे या दरांच्या वर किंवा खाली ठेवू शकत नव्हती. म्हणजेच या दरांप्रमाणेच त्यांना तिकीट निश्चित करावे लागत होते. मात्र ही दरनिश्चिती हटवल्यानंतर आता विमानकंपनी भाडे ठरवण्यास मोकळी झाली आहे.
विमान वाहतूक क्षेत्राला चालना
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रांची स्थिती बिघडली होती. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि विमान वाहतूक क्षेत्रालाही मोठा फटका सहन करावा लागला. देशांतर्गत उड्डाणांसाठी परदेशी विमाने बंद केल्यामुळे या महामारीने देशातील विमान वाहतूक क्षेत्र प्रभावित झाले होते. परंतु आता या क्षेत्राने सुधारणा घडवून आणली असून विशेषतः हवाई प्रवाशांच्या संख्येत तेजी आली आहे. हळूहळू विमान कंपन्याही या तोटय़ातून सावरत असल्याचे दिसत असल्याने नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे.