केआयएडीबी करणार आवश्यक जमिनीचा सर्व्हे
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. जिल्हय़ाचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा बेळगावमध्ये देता याव्यात यासाठी 100 एकर जागेची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक विमान कंपन्या विविध शहरांना सेवा देत आहेत. राज्यातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये बेळगावचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे यापुढील काळात मोठी विमाने उतरण्यासाठी मोठय़ा धावपट्टीची आवश्यकता आहे. त्यासाठी 100 एकर जागा लागणार आहे. महसूल अधिकाऱयांना विमानतळाशेजारील जमिनी विस्तारीकरणासाठी चिन्हांकीत कराव्यात, असे सांगण्यात आले होते. यामुळे या जमिनींचा इतर विकासकामांसाठी वापर होता कामा नये.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार केआयएडीबीला आवश्यक जमिनींचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. सर्वेक्षण अहवालाच्या आधारे जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य म्हणाले की म्हैसूर, मंगळूर व चेन्नई या शहरांना प्रवाशांची मागणी आहे. तसेच प्रवासी संख्याही वाढत असल्याचे सांगितले.
कार्गोचा विस्तार गरजेचा
बेळगाव हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात मशिनरी तयार केल्या जातात. बेळगावमध्ये उत्पादित साहित्य देशभरासह परदेशात पाठविले जाते. त्यामुळे भविष्यात कार्गो वाहतूक वाढणार असल्याने विमानतळाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे.