प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमालीची वाढत आहे. मार्च महिन्यात तब्बल 30 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. फेब्रुवारी महिन्याशी तुलना करता 32 टक्के वाहतूक वाढली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये 23 हजार 84 प्रवाशांनी प्रवास केला होता. मार्च महिन्यात यामध्ये 7 हजार 331 प्रवाशांची वाढ होऊन 30 हजार 467 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवासी संख्येत वाढ होत आहे.
मागील महिन्यापासून आता दररोज बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू आहे. विमानतळाच्या एकूण प्रवाशांपैकी निम्मा वाटा हा दिल्ली येथे ये-जा करणाऱया प्रवाशांचा आहे. सध्या 144 आसन क्षमता असणारे विमान हाऊसफुल्ल होऊन वाहतूक करीत आहे. एप्रिल महिन्यात नागपूर शहरालाही विमानसेवा सुरू झाल्याने एप्रिल महिन्यात यापेक्षा अधिक प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.