पिंपरी / प्रतिनिधी :
माजी राज्यपाल महोदयांनी मोघम आरोप करू नयेत. त्यांना कोणी ब्लॅकमेल केले ते त्यांनी स्पष्टपणे सांगावे म्हणजे त्याचा संबंधितांना खुलासा करता येईल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी राज्यपाल भगतसिंह (Bhagatsingh Koshyari) यांच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरील आरोपाला उत्तर दिले.
पिंपरीतील रहाटणी येथे विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी नको ते मुद्दे भाजपाच्या नेत्यांकडून उकरून काढले जात आहेत. मागच्या काही दिवसांपासून आपण ते पाहतच आहोत. वास्तविक, राज्यापुढील खरी आव्हाने कोणती आहेत, त्याला कारणीभूत कोण आहे, त्याचा माध्यमांनी आणि जनतेने विचार केला पाहिजे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार यांना 440 व्होल्टचा शॉक देणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यावर बोलताना त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. खरा शॉक देणारी जनता आहे. त्यामुळे अशा बाष्फळ बडबडीकडे मी फार लक्ष देत नाही, असे त्यांनी सुनावले. तर नाना काटे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करत असून, या निवडणुकीत काटे यांचा विजय निश्चित आहे. देशाला आणि राज्याला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता वैतागली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : ‘ते’ धमकीचे पत्र पवारांचे नव्हे; तर ठाकरेंचेच
नागपूर अधिवेशनात चार ते पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली होती. काही काळ माध्यमांनी ती लावून धरली. मात्र, नंतर भावनिक मुद्दे बाहेर काढून जनतेचे लक्ष त्यापासून विचलित करण्यात आले. त्यानंतर त्या मंत्र्यांना क्लीन चिट देण्यात आली. ही भाजपाची पद्धतच असल्याची टीकाही पवार यांनी केली.