ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गाडीत बसले होते. मी तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे, यात जितेंद्र आव्हाड सर्वांना बाजूला करत आहेत. यात त्यांनी कोणतीही चूक केलेली दिसत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टता करावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, रविवारी कळवा-खाडी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत मला बाजूला केल्याचा आरोप केला. महिलेच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मागील 72 तासात दोन खोटे गुन्हे दाखल झाल्याने आव्हाडांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पण, जेव्हा विनयभंगाची घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री गाडीत बसलेले होते. त्यांनीच याबाबत अधिक स्पष्टता करावी.
अधिक वाचा : ‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
तसेच मी आव्हाडांना विनंती करतो की, त्यांनी राजीनामा देण्याचा विचारही मनात आणू नये. त्यांनी आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. सत्ता येते-जाते. कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सगळ झाले आहे, त्यांनीच असं काही झाले नसल्याचे सांगितले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.