ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहूत शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. पण अजित पवारांना या कार्यक्रमात भाषणापासून वगळण्यात आले. पक्षनेते म्हणून मोदींच्या आगोदर देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मिळाली. मग अजित पवारांना पालकमंत्री असूनही भाषणापासून का डावलण्यात आलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिळा मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र, मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारलं गेलं. यावेळी मोदींनीही ‘अजितदादांना बोलू द्या’, असा इशारा केला. पण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने ते भाषणासाठी डायसकडे गेले. अजित पवारांना भाषणापासून डावलण्यात आल्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होत आहे.
हा महाराष्ट्राचा अपमान
खासदार सुप्रिया सुळेही यांनी यावर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये प्रोटोकॉलसाठी अजित पवारांचं भाषण व्हावं म्हणून महाराष्ट्र सरकारने पीएमओला विनंती केली होती. पण, ती विनंती त्यांनी ग्राह्य धरली नाही. हे दुर्देवी आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. कार्यक्रमात विरोधीपक्षनेत्यांना भाषणाची संधी मिळते अन् अजित पवारांना भाषणापासून वंचित ठेवण्यात येते, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.