सात दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार : निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख तर निवडणूक नियंत्रण अधिकारी शिवराज नाईकवाडे
प्रतिनिधी/कोल्हापूर
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या दोन्ही अध्यक्षांनी निवडणूक व मतदानाची तारीख वेगवेगळी जाहीर केलीय. त्यामुळे कोणत्या तारखेला मतदान करायचे, असा प्रश्न चित्रपट महामंडळाच्या 44 हजार सभासदांना पडला होता. यात आता धर्मदाय आयुक्तांनी उडी घेतली असून दोन्ही तारखा रद्द करून सात दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक कार्यक्रम अधिकारी म्हणून आसिफ शेख तर निवडणूक नियंत्रण अधिकारी शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती केली आहे. धर्मदाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महामंडळातील दोघांच्या भांडणात तिसऱयाचाच लाभ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळातच अर्थकारणावरून दोन गट पडल्याने चार वर्षे हंबरी-तुंबरीवर येत, एकमेकांवर गुन्हा नोंद करण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी 20 नोव्हेंबरला मतदान होणार अशी घोषणा केली होती. लगेचच उपाध्यक्ष धनाजी यकर यांनी 13 नोव्हेंबरला मतदान होणार, असे जाहीर केले. त्यामुळे या दोन्ही गटापैकी कोणत्या तारखेचे मतदान नियमानुसार आहे, असा पेच सभासदांना पडला. हा वाद एकमेकांना धमकी देण्यापर्यंत चिघळलाय. परिणामी सुज्ञ सभासदांनी धर्मदाय आयुक्तांना या प्रकरणाची माहिती देवून स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली. त्यामुळे धर्मदाय उपायुक्तांनी सोमवारी निवडणूकीची नोटीस काढीत दोन्ही गटांना धक्का दिला. परिणामी सभासदांनाही दिलासा मिळाल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याची भावना सभासदांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली जात आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अंतर्गत निवडणूकीच्या राजकारणाला धर्मदाय आयुक्त कार्यालयाने पूर्णविराम दिला आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे धर्मदाय आयुक्त कार्यालयाला चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा ताबा घ्यावा लागला. आता धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या निवडणूक कार्यक्रमांनुसार निवडणुकांना सामोरे जावे लागणार यात शंका नाही. धर्मदाय आयुक्त आपल्या नियमानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कधीही निवडणूक घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. निवडणूकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पण तिसराच गट तयार झाला तर निरंगी लढतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.