तामिळनाडूत एनडीआरएफच्या तुकडय़ा तैनात ः चेन्नईजवळील किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार
चेन्नई / वृत्तसंस्था
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मॅन्दोस चक्रीवादळ शुक्रवारी मध्यरात्री/ शनिवारी पहाटे महाबलीपुरम जवळच्या किनारपट्टीला धडकणार असल्याने सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे वादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळेस ताशी 75 ते 85 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या वादळामुळे तामिळनाडू, पाँडिचेरी तसेच दक्षिण आंध्र किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच प्रशासनही गतीने कामाला लागले आहे
5 नोव्हेंबरच्या आसपास अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मॅन्दोस या वादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ शुक्रवारी किनारपट्टीच्या दिशेने प्रवास करीत होते. शुक्रवारी सकाळी या वादळाचे तीव्र वादळात रुपांतर झाले. मात्र, दुपारनंतर याचा प्रभाव थोडा कमी झाला. हे वादळ पश्चिम उत्तर-पश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत शुक्रवारी मध्यरात्री पाँडिचेरी ते श्ऱीहरिकोटा दरम्यान असलेल्या महाबलीपुरमच्या जवळ धडकणार आहे. पुढील दोन दिवस हा प्रभाव कायम राहील.
किनाऱयावरील राज्यांमध्ये प्रभाव
सध्या येथील पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, काही भागात नुकसानही झाले आहे. जनजीवन पूवर्वत करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. या वादळाचा प्रभाव राज्यात सोमवारपासून जाणवणार असून, यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होणार आहे. तसेच पुढील आठवडय़ात काही भागात तुरळक पाऊस होईल. तत्पूर्वी शनिवारी राज्यभर थंडीचा प्रभाव राहील, रविवारी मात्र ढगाळ वातावरण जाणवेल.
तामिळनाडूतील 3 जिह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरम या 3 जिह्यांना अधिक सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. मोकळय़ा ठिकाणी वाहने उभी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालये शुक्रवारी बंद ठेवण्यात आली. शनिवारीही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
5,000 हून अधिक मदत छावण्या सज्ज
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळप्रवण जिह्यांमध्ये 5,000 हून अधिक मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. या छावण्यांमध्ये किनारपट्टी भागातील लोकांना ठेवण्यात आले आहे. शिबिरात राहणाऱया लोकांना अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्य यासह सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पावसाच्या परिणामावर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्षही उघडण्यात आला असून, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि त्याचा परिणाम यावर लक्ष ठेवणार आहे.