पंजाब-हरियाणा, मध्यप्रदेशात शेतकऱ्यांना कापणी पुढे ढकलण्याचा सल्ला
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील काही भागात बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये वळीव पाऊस आणि गारपिटीची शक्मयता लक्षात घेऊन गहू आणि इतर रब्बी पिकांच्या काढणी-कापणीची कामे पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. तसेच मोहरी आणि हरभरा यासारख्या पिकांची कापणी झाल्यास सुरक्षित ठिकाणी साठवण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच गव्हाचे पीक खराब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना पाणी न देण्यासही सांगण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत देशातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह हलका/मध्यम पाऊस झाला. उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेशातील रायलसीमा आणि उत्तर कर्नाटकात काही भागात गारपीट व पाऊस झाला आहे. तसेच 19 मार्च रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये 20 मार्चला आणि उत्तराखंडमध्ये 21 मार्च रोजी गारांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राजस्थानच्या शेतकऱ्यांना परिपक्व मोहरी आणि हरभऱ्याची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पूर्व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना मोहरी, हरभरा आणि गव्हाची तात्काळ काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ताबडतोब गहू, कडधान्ये आणि द्राक्षे काढण्यास सांगितले आहे.
राजधानी दिल्लीसह उत्तरेत पाऊस
देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी सकाळी हलका पाऊस झाला. त्याचवेळी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही पावसासोबत गाराही पडल्या. विविध राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक झाले. दिल्लीत रविवारीही हलका पाऊस पडण्याची शक्मयता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पावसामुळे राजस्थानमध्ये वीज पडून तीन तर मध्य प्रदेशात दोघांचा मृत्यू झाला. हरियाणातील कैथल, नरवाना येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. बिहारमधील 26 जिह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशातील 33 जिह्यांमध्ये पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये शनिवारी सायंकाळी पाऊस आणि गारा कोसळल्या.