वृत्तसंस्था /अलीगड
उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मांस प्रकल्पात विषारी वायूची गळती झाल्याने 100 हून अधिक कर्मचाऱयांची प्रकृती बिघडली आहे. वायूगळतीनंतर कर्मचाऱयांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर प्रशासनाचे पथक वायूगळतीचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी करत आहे. ही दुर्घटना अल दुआ मांस प्रकल्पात झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पात गुरुवारी अचानक काम करणारे कर्मचारी खाली कोसळू लागले. अधिकाऱयांनी यासंबंधी चौकशी सुरू केल्यावर वायूगळतीचा प्रकार उघड झाला होता. या घटनेमुळे 100 हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून या महिला कर्मचाऱयांचे प्रमाण अधिक आहे. संबंधित प्रकल्पाच्या संचालकाने वायूगळतीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.