काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळमध्ये रविवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या तारा एअरलाईन्सच्या विमानाचे अवशेष सोमवारी सापडले. अपघातसमयी विमानात चार भारतीयांसह 19 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स होते. या सर्व 22 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचे मृतदेहही सापडले आहेत. मात्र, बर्फवृष्टी आणि दाट धुक्मयामुळे नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरला सोमवारी सायंकाळपर्यंत हे मृतदेह काठमांडूला पोहोचवता आले नव्हते.
नेपाळच्या तारा एअरचे 9-एनएईटी दुहेरी इंजिन असलेले विमान रविवारी सकाळी टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले होते. नेपाळ आर्मीच्या शोध आणि बचाव पथकाला मुस्तांगमधील सनोसवेअर भागातील टेकडीवर विमानाचे अवशेष सापडले आहेत. त्यानंतर अधिकृतपणे छायाचित्रे जारी करून सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. खराब हवामानामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याचे अवशेष 100 मीटर परिसरात विखुरले होते. मात्र मदत व बचाव पथकाला इथपर्यंत पोहोचणे खूप अवघड होते. विमानाचे अवशेष पाहून त्यात आग लागल्याचे स्पष्ट होत असले तरी काही भागांना आग लागली नसल्याचे दिसून आले आहे. एका टेकडीवर विमानाचा मुख्य भाग सापडला असून त्याला आग न लागली नसल्याचे दिसून येत आहे.. तथापि, परिसरात बर्फवृष्टी आणि दाट धुके असल्यामुळे तपास अधिकाऱयांना घेऊन घटनास्थळ गाठणे सध्या अवघड झाले आहे.
अपघातग्रस्त विमानात ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबीय
महाराष्ट्रातील ठाणे येथील एका कुटुंबातील चार जण अपघातग्रस्त विमानात होते. अशोक त्रिपाठी (54), त्यांची पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी (51), मुलगा धनुष त्रिपाठी (22) आणि मुलगी रितिका त्रिपाठी (18) हेदेखील प्रवास करत होते. हे सर्वजण नेपाळमधील पोखरा येथील एका मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सोमवारी नेपाळमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले.
तारा एअरच्या 9-एनएईटी दुहेरी इंजिन असलेल्या विमानाने रविवारी सकाळी 9.55 वाजता पोखराहून जोमसोमला उड्डाण केले होते. मात्र, अवघ्या दहा-पंधरा मिनिटातच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. दुपारच्या सुमारास विमान बेपत्ता झाल्याची माहिती नेपाळ विमानतळ प्राधिकरणाकडून जारी करण्यात आली. विमान बेपत्ता झाल्यानंतर लष्कर आणि हवाई दलाच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विमानाचे अवशेष मुस्तांग येथील लमची नदीच्या काठावर कोसळल्याचे स्पष्ट झाले. शोधमोहिमेत गुंतलेले नेपाळ आर्मीचे हेलिकॉप्टर मुस्तांग भागात पोहोचले होते. तथापि, खराब हवामानामुळे शोध आणि बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. सोमवारी विमान दुर्घटनाग्रस्त झालेल्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात यश आले.