भारत महत्त्वाची भूमिका बजावणार : आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटचा समारोप
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषदेनंतर सर्व देशांनी ‘एआय’चे भविष्य निश्चित करण्यासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली. देशाची राजधानी नवी दिल्लीत 12 डिसेंबरपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2023 सुरू झाली आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम जनतेला आमंत्रित केले होते. गुरुवार, 14 डिसेंबर हा परिषदेचा शेवटचा दिवस होता. ‘एआय’चे भविष्य सर्वसमावेशक असले पाहिजे, ते एक किंवा दोन देशांवर सोडले जाऊ नये. एक किंवा दोन देश एकटे ‘एआय’चे भविष्य घडवू शकत नाहीत. या भूमिकेवर सर्व सहभागी प्रतिनिधींचे एकमत झाल्याने या मुद्यावर सर्व देशांनी हातमिळवणी केली आहे. तसेच भविष्यात ‘एआय’च्या जडणघडणीत भारतावर महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. 8 डिसेंबरलाच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर या कॉन्फरन्सची माहिती देत लोकांना आमंत्रित केले होते. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटमध्ये जगातील जवळपास 27 देश सहभागी झाले होते. याशिवाय 150 हून अधिक वक्त्यांनी आपली मते मांडली आहेत. या इव्हेंटमध्ये दीडशेहून अधिक ‘एआय’ स्टार्टअप्स देखील सहभागी झाले होते. तसेच ‘एआय’ उत्पादनांचे एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.