तृणमूल काँग्रेस होणार नाही सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने 21 जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या या पारंपरिक बैठकीत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस खासदार राहुल गांधी सामील होणार आहेत. तर तृणमूल काँग्रेसचा कुठलाच प्रतिनिधी या बैठकीत सामील होणार नाही, कारण पक्ष 21 जुलै रोजी ‘शहीद दिन’ पाळतो.
1993 मध्ये कोलकाता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काँग्रेसचे 13 कार्यकर्ते मृत्युमुखी पडले होते. गोळीबाराच्या घटनेवेळी ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. याचमुळे 1 जानेवारी 1998 रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यावरही त्या दरवर्षी शहीद दिनी संबंधित कार्यकर्त्यांचे स्मरण करतात. त्यादिवशी तृणमूल काँग्रेसकडून एका सभेचेही आयोजन केले जाते. तर संसदेचे पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत प्रस्तावित आहे. अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर केला जाणार आहे.
दुसरीकडे खासदार गौरव गोगोई हे काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते असणार आहेत. या निर्णयाविषयी एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पक्षाकडून पाठविण्यात आले आहे. गोगोई हे लोकसभेच्या मागील कार्यकाळात देखील पक्षाचे उपेनेते होते. तर केरळमधून 8 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले के. सुरेश हे पक्षाचे मुख्य प्रतोद असतील. विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर आणि किशनगंजचे खासदार मोहम्मद जावेद हे लोकसभेत पक्षाचे प्रतोद म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत