ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
आज दुपारी 12 वाजता संसद भवनात या बैठकीला सुरूवात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील पक्षांचे नेते यात सहभागी होणार आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात येणारे मुद्दे सरकारकडे मांडणे आणि विरोधी पक्षांनी आपल्या चिंतेचे मुद्दे मांडणे अपेक्षित आहे. यानंतर सभागृहात सहकार्याच्या रणनीतीसाठी एनडीएच्या नेत्यांचीही बैठक होणार आहे.
अधिक वाचा : खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; 2 जागीच ठार, 5 जखमी
दोन टप्प्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. उद्या (दि. 31) सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात होईल. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार असून 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत. या अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत असेल. त्यानंतर 14 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत संबंधित विभागांच्या संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागणीची तपासणी आणि आपल्या मंत्रालय आणि विभागांशी संबंधित अहवाल तयार करतील. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.