पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ सातारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री म्हणून डबल काम करावे लागणार आहे, असे सांगत पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज दिवसभरात सर्व खातेप्रमुखांच्या बैठका घेतल्या आहेत. नियोजन समितीची बैठक दि. 30 रोजी होत आहे. त्या बैठकीत जी रखडलेली कामे ती मार्गी लावण्यात येणार आहेत. जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते सोडवले जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पालकमंत्री म्हणून आता सर्व विभागांची, सर्व योजनांची सर्वस्वी जबाबदारी सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझी राहिल. पालकमंत्री असला तरी तो माणूस आहे. माणसाच्या हातून चुका होतात. चुका पोटात घेऊन खेळीमेळीच्या वातावरण राहिल. अधिकारी, पत्रकार यांच्यात समन्वय असेल तेव्हा अधिक गतीने पुढे जाता येईल. गेल्या अडीच वर्षात वाशिमचा पालकमंत्री होतो. त्या जिह्यात दोन भाजप आमदार त्यावेळी होते. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी होत्या. सर्वपक्षीय सोबत घेऊन चाललो होतो. आमदार होतो तरी तोऱयात वागलो नाही. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांचे विशेष लक्ष आहे. जे प्रलंबित प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न करु. त्यांनी पुनवर्सनचा प्रश्न दहा मिनिटात सोडवला. एमएमआरडीच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्यक्रम राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सर्व विभागाचा आढावा घेतला
पालकमंत्री झाल्यानंतर काल दिवसभर मतदार संघात होतो. त्यानंतर आज सर्व खाते प्रमुख बोलावले होते. सर्व आढावा घेतला. जवळपास सहा महिने होऊन गेले. दि. 30 रोजी नियोजन समितीची पहिली बैठक घेतो आहे. त्याबाबतचे नियोजन केले आहे. पूर्वी 12 महिने खर्च करता येत होता निधी आता तो निधी सहा महिन्यात खर्च करता येणार आहे. मेडिकल कॉलेज असेल वा इतर प्रश्न असतील, त्यात सगळ्यात महत्वाचे दरड प्रवण असलेली पाटण, जावली, वाई या तालुक्यातील गावांचा प्रश्न होता. तो सोडवला गेला आहे. प्रत्येक वेळी वेगळा प्रस्तवा पाठवला जायचा. आता तिथल्या तिथल्या जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत. त्यांना सूचना दिल्या आहेत. जिह्यात 400 कोटींचा नियत वे उपलब्ध आहे, जिल्हाचा विकास पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पर्यटन विभागाकडून एक दोन महिन्यात आरखाडा तयार होईल. एमटीडीसी विभागाल सुचना दिल्या आहे. जलसंपदा विभागाचे शेतीला पाणी आले तर अनेक उद्योग एमआयडीसीतून उभे राहतील. ग्रामीण भागात रस्त्याचा प्रश्न आपण बघतो. त्याकरता डोंगरी विभागाचे वेगळे पॅकेज सातारा जिह्यासाठी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पबाबत वनमंत्री निर्णय घेतील
नवीन महाबळेश्वर या प्रकल्पाबाबत अनेक जाचक अटी होत्या. पाईप लाईनला सुद्धा परवानगी दिली जात नव्हती. परंतु मोठया रिसॉर्टला परवानगी असायची. त्याकरता रस्ते केले जायचे. त्यावरुन स्थानिकांनी रोष व्यक्त केला होता, असे सांगत मंत्री शंभूराज देसाई यांनी वन विभागामध्ये अतिक्रमण केले तर वन्यप्राणी तुमच्या घरात येईल. कासचा अहवाल माझ्यापर्यंत आलेला नाही. तो आल्यानंतर अभ्यास करुन कार्यवाही करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रकार हा कोणीतरी केलेला आगाऊपणाच
संतोष बांगर आमचे विधीमंडळातील सहकारी आहेत. ते त्यांच्या खाजगी देवदर्शनासाठी कुटुंबाबरोबर जात असताना चार पाच व्यक्तींनी त्यांची गाडी अडवण्याचा, गाडीला हातवारे करण्याचा प्रयत्न केला. तत्काळ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा भ्याड हल्ला आहे. आमदार बांगर यांनी सांगितले आहे त्याला हल्ला म्हणता येणार नाही. पाठीमागून येवून कोणीतरी केलेला आगावूपणा आहे. असे होवू नये. घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. पोलीस निश्चितपणाने हल्लेखोरांवर कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी पोलीस कर्मचाऱयांच्या सोयीबाबत पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. तसेच सिव्हिलच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. माझा दौरा ठरला होता. पण हिंदूगर्जना मेळाव्यामुळे गेलो नाही. जिल्हाधिकारी आणि आरोग्य संचालकांना फोन करुन सुचना देतो, असेही त्यांनी सांगितले.
कोण सत्यजित?
सत्यजितसिंह पाटणकर हे सोशल मीडियावर फार ऍक्टीव्ह झाले असून तुमच्यावर टीका करत असतात या प्रश्नावर ते म्हणाले, कोण सत्यजित त्यांनीच उलट प्रश्न केला. त्यावर जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, असे सांगताच त्यांनी अच्छा म्हणत, पुढे त्यांनी पाटणकरांना लोकांच्यात जायला वेळ मिळत नाही म्हणून ते सोशल मीडियावर वेळ घालवत असतात, अशी टीप्पणी त्यांनी केली.