आम आदमी पार्टीच्या मागणीने खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथील कन्नड संघटनांना राज्योत्सव करण्यासाठी पैसे दिले जातात. मात्र बेळगावमधील कन्नड संघटनांना पैसे का दिले जात नाहीत? वास्तविक बेळगावमधील कन्नड संघटना गेली अनेक वर्षे राज्योत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करत आहेत. त्यामुळे येथील कन्नड संघटनांना पैसे द्यावेत, अशी मागणी आपच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आपने ही मागणी करून राज्योत्सव करण्यासाठी सरकार पैसे देत असल्याचे उघड केले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी भाषिक काळा दिन असू दे, शिवजयंती असू दे, गणेशोत्सव वा इतर सण स्वखर्चाने थाटामाटात साजरा करतात. म्हैसूर दसऱयाप्रमाणे शिवजयंती आणि गणेशोत्सवची मिरवणूक मराठी भाषिक काढत असतात. सरकारच्या कोणत्याही निधीवर किंवा देणगीवर काढत नसतात. मात्र आता कन्नड भाषिक संघटना पैसे घेऊन राज्योत्सव साजरा करत आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
येथील मराठी भाषिकांवर काही कन्नड दुराभिमानी पाणी, वीज, इतर सेवा घेऊन महाराष्ट्राचे गुणगान गातात, असा आरोप करत होते. मात्र त्यांना हे माहिती नाही की, येथील जनता सर्वात जास्त कर्नाटकाला कर देते. उलट सरकारकडून मराठी भाषिकांना कसलाही मोबदला अथवा मदत मिळत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांवर आरोप करणाऱयांनी याचे चिंतन करण्याची वेळ आली आहे. मराठी भाषिकांकडून मिळालेल्या करावरच राज्योत्सव साजरा केला जात आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. आपने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन येथील संघटनांनाही पैसे द्यावेत, अशी मागणी केली आहे. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणताही सण किंवा उत्सव साजरा करायचा असेल तर मराठी भाषिकांकडूनच शिकले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. यावेळी राजू टोपण्णावर, शंकर हेगडे, समीर सय्यद, बसीरअहम्मद जमादार, अब्दुल तवाप शेख, रविंद्र बेल्लद व कार्यकर्ते उपस्थित होते.