ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (panjab former cm amrinder singh) यांनी आपला पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) पक्ष भाजपमध्ये विलीन केला. तसेच त्यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. तोमर म्हणाले की, पीएलसीचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देशाला नेहमीच अव्वल ठेवले आहे. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. अमरिंदर सिंग यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नेते आणि पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती अजयब सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो. काँग्रेसच्या काळातील सरकारने लष्कराला बळ दिले नाही. तसेच अँटनी संरक्षण मंत्री असताना सरकारने त्यांच्याशी संरक्षण करार केला नाही. त्याचबरोबर पंजाब हे भारताचे सीमावर्ती राज्य आहे आणि इथे अनेक आव्हाने आहेत. पंजाब हे पाकिस्तानला लागून असलेले राज्य असून तेथे अत्यंत संवेदनशील परिस्थिती असून अलीकडे ड्रोनचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये ड्रग्जचा विळखा वाढला आहे.