ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची १२ सप्टेंबरला पैठण येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला भरघोस गर्दी व्हावी म्हणून पैसे देऊन सभेसाठी नागरिक जमवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा आरोप विधान परिषद अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केला.
दरम्यान, पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची जी सभा झाली होती. त्यानंतर संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) ज्यावेळी स्वत: पैठणला गेले. त्यावेळी जवळपास १०० खुर्च्या सुद्धा सभेला भरलेल्या नव्हत्या. त्यामुळे या सभेचं आयोजन करण्यात आलं. परंतु तिची सुद्धा फट-फजिती अशा पद्धतीने होत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाड्यानं लोकं आणतात, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
सभेसाठी रेड कार्डचा वापर करत असल्याचा सवाल पत्रकारांनी दानवेंना विचारला असता ते म्हणाले की, शिवसेनेचं कार्य करत असताना आम्हाला कोणतंही काम करावं लागत नाही. गावचे सरपंच, कार्यकर्ते, गटप्रमुखांना सांगितल्यानंतर ते आपल्या गावातल्या लोकांना जमा करुन आणतात. मी जबाबदारीने बोलतो की, निघताना गाडीघोड्याची व्यवस्था, नाश्ता, जेवणाची आणि सभेच्या निमित्ताने काही रकमेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येकी १ हजार ५०० रुपये देऊन भाड्याने लोकं आणली जातायत. तुम्ही पत्रक जरी पाहिलं तर ते ८ सप्टेंबरचं आहे. तसेच हे पत्रक मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
अंबादास दानवे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आहे. या सभेला प्रतिसाद मिळणार नाही, हे माहिती असल्याने संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलं आहे. या सभेच्या अनुषंगाने ४२ गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले.