पुणे / प्रतिनिधी :
सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिवसेनेच्या लढाऊ नेत्या असून, त्यांचा हल्ला जिव्हारी लागल्यानेच शिंदे गटाची चिडचिड सुरू आहे. आता त्यांच्या विभक्त पतीला शिंदे गटात प्रवेश देऊन व पुढे करून आपण किती खालच्या पातळीवर उतरू शकतो, हेही संबंधितांनी दाखवून दिले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
पुण्यात आले असता ते पत्रकारांशी ते बोलत होते. दानवे म्हणाले, सुषमा अंधारे यांचे वक्तृत्व, अभ्यास दांडगा असून, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांमुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे. त्यांचे घाव त्यांच्या वर्मी बसत आहेत. हल्ला जिव्हारी लागल्यानेच आता शिंदे गटाने खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू केले आहे. विभक्त पतीला प्रवेश, हा त्याचाच भाग आहे. मात्र, अशा गोष्टींनी काही फरक पडणार नाही. उलट यातून आपण बॅकफुटवर गेलो असल्याचेच शिंदे गटाने मान्य केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर बोलताना ते म्हणाले, कीर्तिकर यांनी अचानक निर्णय घेतला. ते ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने त्यांना आमदार, मंत्री, खासदार केले. सर्व सन्मान दिले. तरीही त्यांनी ही भूमिका घ्यावी, हे खेदजनक आहे. आपल्याला सन्मान दिला जात नाही, हा त्यांचा आरोप खोटा आहे. ज्या लोकांच्या मनात विष पेरलेले आहे व त्यांच्या मनातही ते पसरलेले आहे, त्या लोकांनी जावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे याचा सेनेवर काही परिणाम होणार नाही, असेही दानवे यांनी नमूद केले.
अधिक वाचा : ‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी एकत्र आले आहेत. त्यामुळे कुणाला पोटशूळ उठला असेल, तर त्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. भारताला जोडण्यासाठी राहुल गांधी यात्रा करत असतील, तर ते चांगले आहे. युवा शक्ती एकत्र आली, तर येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.
मध्यावधीची शक्यता नाकारता येत नाही
सध्याचे सरकार असंवैधानिक पद्धतीने सुरू आहे. निलंबित आमदारांच्या मुद्दय़ावर कोर्टात याचिका आहे. असे सरकार फार काळ कसे चालेल? त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचे नातू आहेत. ते अंधश्रद्धा पाळत नाहीत, अशा शब्दांत बावनकुळेंच्या वक्तव्याचा दानवे यांनी समाचार घेतला.