तलावातील सर्वच फरशा बदलल्या : 20 लाख रुपये खर्ची, 1 डिसेंबरपासून तलाव सुरु होणार, पावणे दोन वर्षे तलाव होता बंद
कोल्हापूर / संग्राम काटकर
गेली पावणे दोन वर्षे बंद ठेवलेला अंबाई (टँक) जलतरण तलाव कधीपासून सर्वांसाठी खुला होणार याची प्रतिक्षा आता संपली आहे. शिवाय कात टाकलेला हा तलाव नव्या रुपातही दिसणार आहे. गेली चार महिने महापालिका कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन जलतरण तलावातील फुटक्यांबरोबर सर्वच फरशा काढून त्याच्या जागी निळ्या रंगाच्या नव्या फरशा बसवल्या आहेत. फरशांच्या लाईनीतून तलावातील क्लोरिनयुक्त पाणी झिरपू नये, यासाठी जमिन वॉटरप्रुपिंग केली आहे. या सगळ्या कामासाठी महापालिकेने 20 लाख रुपये पैसे खर्च केलेत. येत्या 1 डिसेंबरपासून तलाव सुरु करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे तलावाचे बंद राहिलेले शटर आता 8 बॅचमध्ये पोहोण्याचा आनंद लुटणाऱया सर्वांसाठी खुले होणार आहे.
2020 च्या मार्चमध्ये कोरोना आल्यापासून तलाव जो बंद पडला होता आजतागायत बंदच राहिला आहे. देखभालीसह अन्य कामासाठी तलावात सेवा करणाऱया कर्मचाऱ्यांना तातडीने अन्य विभागातील कामात रुजू केले गेले. पण जोवर तलावातील फुटलेल्या फरशा बदल्या जाणार नाही, तोवर तलाव सर्वांसाठी खुला करता येणार नाही, अशी वस्तुस्थिती महापालिकेसमोर होती. कारण या फुटक्या फरशा लागून अनेकांचे पाय रक्तबंबाळ झाल्याची अनेक उदाहरणे महापालिकेनेच पाहिली होती. शिवाय जलतरण करणाऱयांच्या पायाच्या जखमा पाहून अनेकांनी तलावाकडे पाठ फिरवली होती. याचा परिणाम तलावाच्या माध्यमातून महापालिकेला मिळणाऱया उत्पन्नावर झाला होता. दैनंदिन खर्च आणि मिळकत याचे गणितही चुकत राहिले. मात्र कोरोना आल्याने निर्बंधानुसार तलाव बंद ठेवला. त्यामुळे तलावातील पाणी फिल्टरेशन प्लँटवरील खर्चासह अन्य खर्चात बचत झाली. मात्र तेव्हापासून आजतागायत म्हणजे पावणे दोन वर्षे तलाव बंद राहिला ही वस्तुस्थिती आहे. मधल्या काळात रोज झालेल्या उन्हाचा माऱयाने पुर्वीच्या तूलनेत अनेक फरशा तडतडल्या होत्या. डोळ्यादेखत तलावाची झालेली ही अवस्था पाहून अनेकांनी फरशा बदलण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे लावून धरली होती. पण निधीचे कारण सांगुन वेळ मारुन नेली जात होती.
सहा महिन्यांपूर्वी मात्र जलतरण तलाव सुरु करण्यासाठी महापालिका पातळीवर सुरु झालेल्या हालचालींनी जोर धरला. त्यामुळे तलावातील फरशा बदलण्यासाठी महापालिकेला 20 लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी ठेवावी लागली. कामाबाबत सांगताना उपशहर अभियंता एन. एस. पाटील म्हणाले की मनपाचे कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे यांनी चार महिन्यापूर्वी तलावातील पुर्वीच्या निळ्या रंगाच्या फरशा काढल्या होत्या. मात्र याचवेळी पावसाने जोर धरला. त्यामुळे नव्या फरशा बसवण्याचे काम बंद ठेवले. गेल्या महिन्यापासून कामाला पुन्हा सुरुवात करुन तलावात नव्या निळ्या रंगाच्या फरशा बसवल्या. तलावातील क्लोरिनयुक्त पाणी झिरपू नये, यासाठी जमिनिला वॉटर प्रुपिंग करुन घेतले. आता लवकरच डागडुजी कामे उरकून 1 डिसेंबरपासून जलतरण तलाव सुरु sकेला जाणार आहे. त्यामुळे पावणे दोन वर्षे अंबाई जलतरण तलावापासून लांब राहिलेल्या शेकडो अबालवृद्धांना आता पोहोण्याचा आनंद लुटता येणार आहे.
रिक्त जागा भरण्यास मुहूर्त कधी मिळणार
नव्या फरशा बसवल्याने अंबाबाई जलतरण तलावाला नवा लुक आला ही जरी जमेची बाजू असली तरी तलावावरील कर्मचाऱयांची कमतरता नजरेआड करता येणार नाही. सध्या तलावावर दोन लाईफ गार्ड आहे. आणखी 3 गार्डची आवश्यकता आहे. 8 ते 10 वर्षांपासून रिक्त झालेली पंप ऑपरेटरची जागा तर अद्यापही भरलेले नाही. पंप ऑपरेटर हा पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. आता हे वॉचमन करत आहे. त्यामुळे रिक्त जागा भरण्यास महापालिकेला मुहुर्त कधी मिळणार आहे हेच आम्हाला पहायचे आहे. तलावाच्या दोन प्रवेशद्वारावरील मोडून पडलेली लोखंडी दारेही काढून नवी बसवावी लागणार आहेत, असे तलावात पोहोण्याचा आनंद लुटणाऱ्यांचे सांगणे आहे.