विश्व इंडियन पार्टीच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन सुरू
वार्ताहर/ कराड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटवावीत तसेच पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून कारंजे बसवण्यात यावेत, या मागणीसाठी विश्व इंडियन पार्टीच्या वतीने सोमवारपासून पालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
याबाबत विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटवून पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. तसेच पुतळा परिसरात कारंजे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कारंजे बसवण्याचा ठराव झाल्याचे पत्र मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहे. या पत्रात पुतळ्याच्या चबुतऱयाची उंची वाढवणे व आयलॅण्डची रुंदी वाढवणे आदी कामे पूर्ण झाल्यानंतर कारंजे उभारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे बापूसाहेब लांडगे यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शांताराम थोरवडे उपस्थित होते.