मणिपूरमध्ये काही भागांमध्ये उसळलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला कर्नाटक दौरा रद्द केला आहे. कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असल्याची माहिती भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये उसळलेल्या परिस्थिती लक्ष ठेवण्यासाठी तसेच राज्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत दाखल झाले आहेत. शहा दिल्लीतूनच मणिपूर राज्यामध्ये शांतता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ते राज्य आणि केंद्र सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. राष्ट्रीय राजधानीत मुक्कामी असलेले शाह मणिपूरच्या परिस्थितीबद्दल सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांकडून नियमित माहिती घेत आहेत. शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस प्रमुख, केंद्रीय गृह सचिव आणि केंद्र सरकारचे इतर उच्च अधिकारी उपस्थित असलेल्या दोन व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या आहेत.
गुरुवारी, शाह यांनी त्यांच्या सर्व निवडणूकांच्या बैठका रद्द करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूर मधील अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांशी बोलून घेतले. तसेच त्यांनी उत्तर- पुर्व राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर- पूर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. “राज्यातील परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी रात्री उशिरा मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि इतर उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली,” असे सूत्रांनी सांगितले.
अमित शाह हिंसाचारग्रस्त राज्याला भेट देण्याची शक्यता बोलली जात होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून गृहमंत्री अमित शहा दिल्लीतूनच परिस्थितीवर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.
मणिपूरमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्लॅग मार्चही काढण्यात आला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात मेईतेई जमातीचा समावेश करण्याच्या मागणीचा निषेध करण्यासाठी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन (एटीएसयू) या संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले असून त्यांची परिणिती हिंसाचारात झाली आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी आयोजित केलेल्या एका रॅलीदरम्यान हा हिंसाचार उफाळला.