पंतप्रधान शेख हसीना यांचा आरोप : बागंलादेश-म्यानमारच्या काही भागांमध्ये अवैध कारवाया
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश आणि म्यानमारच्या काही भागांमधून ईस्ट तिमोरसारखा एक ख्रिश्चन देश निर्माण करण्याचा कट रचला जात आहे. परंतु मी असे घडू देणार नाही असा दावा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. एकदा देशाकडून मला समस्यामुक्त पुनर्निवडणुकीचा प्रस्ताव देण्यात आला होता, याकरता संबंधितांकडून बांगलादेशच्या क्षेत्रात वायुतळ स्थापन करण्याची अनुमती मागण्यात आली होती असे शेख हसीना यांनी सांगितले आहे. हसीना यांनी हा दावा अमेरिकेला उद्देशून केल्याचे मानले जात आहे.
अवामी लीगच्या अध्यक्ष हसीना यांनी स्वत:च्या सरकारला समर्थन देणाऱ्या 14 पक्षांची बैठक घेतली आहे. देश आणि विदेश दोन्ही ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागतेय आणि सध्या देशाच्या विरोधात एक कट रचला जात आहे. पूर्व तिमोरप्रमाणे काही जण बांगलादेश (चट्टोग्राम) आणि म्यानमारच्या काही हिस्स्यांना एकत्र करत एक ख्रिश्चन देश निर्माण करू पाहत आहेत असा दावा हसीना यांनी या बैठकीला संबोधित करताना केला आहे. हसीना यांचा हा दावा भारताला देखील सतर्क करणारा आहे, कारण गृहयुद्धाने होरपळत असलेल्या म्यानमारची सीमा भारताला लागून आहे.
व्यापार हा प्राचीन काळापासूनच बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या माध्यमातून होत राहिला आहे. अनेक लोकांची नजर या ठिकाणावर आहे. येथे कुठलाच विवाद अन् संघर्ष नाही. संबंधितांच्या नजरेत हा देखील माझा एक अपराध आहे. संबंधित प्रस्ताव एका श्वेतवर्णीयाकडून आला होता. याचे लक्ष्य केवळ एक देश असल्याचे वाटत नाही. ते अन्य दिशेला जाण्याचा उद्देश बाळगून असल्याचे मी ओळखून आहे. याच कारणामुळे अवामी लीग सरकार नेहमी संकटात असते. आम्हाला आणखी समस्या होईल, परंतु याविषयी चिंता करू नका. मी कुठल्याही विशेष देशाला बांगलादेशात वायुतळ स्थापन करण्याची अनुमती दिली असती तर मला कुठलीच समस्या झाली नसती. कटामुळे काहीच फरक पडत नाही. मी कधीच दबावासमोर झुकणार नाही असे हसीना यांनी म्हटले आहे.
निवडणूक रोखण्याचा होता कट
देशातील विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने निवडणूक रोखण्याचा कट रचला होता असा आरोप हसीना यांनी केला आहे. सरकार पाडण्याचे कट रचले जात आहे. माझे वडिल वंगबंधू शेख मुजीबर रहमान यांना जे परिणाम भोगावे लागले होते, तेच मला भोगावे लागू शकतात असे हसीना यांनी म्हटले आहे. शेख मुजीबुर रहमान यांची 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांच्या दोन मुली वगळता कुटुंबातील बहुतांश सदस्यांसोबत हत्या करण्यात आला होत. तर विदेशात वास्तव्य असल्याने शेख हसीना यांचा जीव वाचला होता.