अन्नधान्याच्या किमती वाढल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर अधिक राहिला आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर मन्ह्यात किरकोळ महागाई दर 5.55 टक्के राहिला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर 4.87 टक्के इतका होता. जुलै महिन्यात टोमॅटो समवेत अन्नधान्याच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई दर 7.44 टक्क्यांच्या अत्याधिक स्तरावर पोहोचला होता. ज्यानंतर ऑगस्टमध्ये हा दर कमी होत 6.83 टक्के तर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आला होता.
सांख्यिकी मंत्रालयाने किरकोळ महागाई दराचा डाटा जारी केला आहे. या डाटानुसार नोव्हेंबर महिन्यात खाद्य महागाई दरातही वृद्धी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात खाद्य महागाई दर वाढून 8.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर ऑक्टोबर महिन्यात 6.61 टक्के इतका होता. फळे-भाज्या, डाळी, मसाल्यांच्या किमती वाढल्याने खाद्यमहागाईत वाढ झाली आहे.
डाळींचे वाढलेले दर सर्वसामान्यांना सर्वाधिक सतावत आहेत. डाळींचा महागाई दर वाढून 20.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर ऑक्टोबरमध्ये 18.79 टक्के राहिला होता. धान्य आणि त्याच्याशी निगडित उत्पादनांचा महागाई दर 10.27 टक्के राहिला आहे. मागील महिन्यात हे प्रमाण 10.65 टक्के राहिले होते. मसाल्यांचा महागाई दर 21.55 टक्के राहिला असून मागील महिन्यात हे प्रमाण 23.06 टक्के इतके होते. फळांचा महागाई दर 10.95 टक्के इतका असून मागील महिन्यात हा आकडा 9.34 टक्के इतका होता. भाज्यांच्या महागाई दर वाढ झाली असून हे प्रमाण 17.70 टक्के राहिले आहे.
किरकोळ महागाई दरात वाढ झाल्याने आगामी काळात कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या सर्वसामान्यांना झटका बसू शकतो. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच अन्नधान्याच्या किमतीतील वृद्धीवर चिंता व्यक्त केली होती.