उप अधीक्षकांच्या बैठकीत झाला निर्णय : पन्नास सर्वधर्मीय प्रतिनिधींची उपस्थिती
प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील धार्मिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी मंगळवारी संध्याकाळी वास्कोतील सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक घेऊन सर्वधर्मियांमधील सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्वधर्मियांची शांती समिती निवडण्याचेही या बैठकीत ठरले.
श्रीरामनवमीच्या रात्री वास्कोतील इस्लामपूर भागात झालेल्या शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर निर्माण झालेला तणाव पुन्हा डोके वर काढणार नाही याची खबरदारी आता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. पुढील काही दिवसांत हनुमान जयंती, गुड फ्रायडे व इस्टर बरोबरच रमजान ईदही जवळ आलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंतीही साजरी होणार आहे. या उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच धार्मिक सलोखा व शांतता बिघडू नये यासाठी विविध धर्मियांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करणे तसेच काही सुचना करणे आवश्यक वाटल्याने मंगळवारी संध्याकाळी पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी पोलीस स्थानकात बैठकीचे आयोजन केले होते.
वास्कोतील पन्नास सर्वधर्मीय प्रतिनिधी
वास्को परिसरातील विविध देवस्थानचे पदाधिकारी, मशिद तसेच मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधी, चर्चचे प्रतिनिधी मिळून सुमारे पन्नास सर्वधमीय प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक कपिल नायक व पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी उपस्थितांना सर्वधर्मियांमधील शांती व सलोख्यासंबंधी मार्गदर्शन केले व खबरदारीच्या उपययोजनांसाठी काही सूचनांही केल्या.
चर्चेला सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद
यावेळी सर्वधर्मियांच्या प्रतिनिधींची शांतता समिती निवडण्यासंबंधीही चर्चा झाली. कुठलेही धार्मिक कार्यक्रम व उपक्रम आयोजित करताना पोलिसांनाही विश्वासत घ्यावे व पुढील रूपरेषा ठरवावी असेही यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले. उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी चर्चेत सहभागी होऊन बैठकीत व्यक्त झालेल्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
मारहाण प्रकरणात 13 जणांना अटक
वास्कोतील पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या तडकाफडकी बदलीनंतर सोमवारी रात्री पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे व पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी वास्कोतील या पदांचा ताबा घेतला. ताबा घेताच त्यांनी वास्कोतील मशिदीजवळ त्या रात्री झालेल्या मारहाण प्रकरणी 13 जणांना अटक केली आहे.
पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी श्रीराम शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटेपर्यंत परिस्थिती योग्यरित्या हाताळली होती. इस्लामपूर बायणातील मशिदीबाहेर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी जमावाने घातलेला गोंधळ परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी पुरेसा होता. मात्र, वास्को पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, दोन्ही जमावांच्या अट्टाग्रहामुळे तणाव वाढतच गेला. तरीही अनुचित प्रकार टाळण्यास पोलिसांना यश आले. त्यांनी या एकूण प्रकरणाच्या तपासालाही सुरवात केली होती. मात्र, दगडफेकीची ती घटना अणि त्यानंतरच्या तणाव वाढवणाऱया घडामोडी सलीम शेख आणि नितीन हळर्णकर या संबंधीत पोलीस अधिकाऱयांना महागात पडल्याचे बोलले जात आहे.
रमेशला मारहाणप्रकरणी 13 अटकेत
शोभायात्रेवरील दगडफेक प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यातील एका प्रकरणाचा छढा लावताना 13 जणांना अटक केली. नंतर त्यांना जामीनावर मुक्त केले. शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर आपल्या घरी परतताना वास्को शहरातील मशिदीजवळ रमेश भिंगी या युवकाला काही जणांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी त्याने पोलीस तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. शोभायात्रेवर झालेली दगडफेक तसेच इस्लामपूर बायणातील मशिदीसमोर घातलेल्या हैदोसाचा तपास पोलीस करीत आहेत. काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.